विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील आर्य आणि द्रविड संघर्ष आणि त्याबाबतच्या थिअरींवर सडकून टीका केलीय. तसेच ही थिअरी ब्रिटिशांनी भारताला पारतंत्र्यात टाकण्यासाठी वापरल्याचा आणि आता ही थिअरी खोटी ठरल्याचा दावा केला आहे. यावेळी फडणवीसांनी भारतातील सगळे एकाच बापाची औलाद असून बंगालचे ब्राह्मण आणि उत्तर प्रदेशातील दलित यांचा डीएनए एकच असल्याचंही मत व्यक्त केलं. ते मंगळवारी (१९ एप्रिल) पुण्यात 'भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अलिकडच्या काळात कार्बन डेटिंगपेक्षा डीएनए टेस्टिंग हा अत्यंत महत्त्वाचा विषय तयार झालाय. या डीएनए चाचणीतून नवी थिअरी समोर आली. त्या थिअरीला जगातील चांगल्या जर्नल्सने स्थान दिलं. ती थिअरी असं सांगते की जगात जी काही मानव जात आहे त्या मानव जातीत सगळ्यात मोठा डीएनएचा हॅप्लो ग्रुप आर१ए१ए (R1A1A) नावाचा आहे. याची सर्वाधिक विविधता भारतात पाहायला मिळते." "भारतात कोणत्याही जातीचे असो सर्वांचा डीएनए एकच" "या डीएनएचा संपूर्ण अभ्यास करून भारतातून लोक कसे युरोपात गेले, मध्यपूर्व युरोपात गेले, आशियात गेले याचे तथ्य समोर आले आहेत. त्यामुळे आर्य-द्रविड ही थिअर संपली आहे. कारण याच डीएनएच्या चाचणीतूनसमोर आलं की भारतात राहणाऱ्या सगळ्यांचा मग ते कोणत्याही जातीचे असो त्यांचा डीएनए एकच आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. "भारतातील सगळे एकाच बापाचे औलाद निघाले" "अंदमानचे आदिवासी, बंगालचे ब्राह्मण, दक्षिणेतील नायर आणि उत्तर प्रदेशातील दलित या सर्वांचा डीएनए एकच निघाला. हे सगळे एकाच बापाचे औलाद निघाले. त्यामुळे कोणीतरी आर्य आहे, कोणीतरी द्रविड आहे, कोणीतरी ब्राह्मण आहे, कोणीतरी क्षुद्र आहे हे सर्व संपलं आहे," असंही फडणवीस यांनी नमूद केलं. "पारतंत्र्यात टाकण्यासाठी भारतीय समाजाचा तेजोभंग" देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मॅक्स मुलरने आर्य बाहेरून आले होते ही थिअरी या ठिकाणी मांडली. ते प्रतिपादीत करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. याचंही या पुस्तकात उत्तम वर्णन करण्यात आलं आहे. हे खरंच आहे. या देशाला पारतंत्र्यात टाकण्यासाठी भारतीय समाजाचा तेजोभंग करण्यात आला. समाजाचं आत्मभान आणि आत्मतेज हरवतं तेव्हा त्याला गुलाम करता येतं. भारतावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येकाला हे माहिती होतं. त्यामुळे मुघल असो की इतर कोणतेही आक्रमक असतील त्यांनी राम मंदिरावर, श्रीकृष्ण भूमीवर हल्ला केला." "ते कोठेही मशिद बांधू शकले असते, पण." "ही मंदिरं खंडीत केली कारण त्यांना हे दाखवायचं होतं की तुम्ही ज्यांना ईश्वर मानता त्या ईश्वराला खंडीत करुनही आम्ही तुमच्यावर राज्य करू शकतो. म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, आमचा विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आमचा ईश्वर आणि आमची संस्कृती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी हे हल्ले झाले. अन्यथा ते कोठेही मशिद बांधू शकले असते. खूप जागा होती," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. "मशिद बांधणं हे त्यांचं उद्दिष्ठ नव्हतं, त्यांना भारतीय समाजाचा तेजोभंग करायचा होता" फडणवीस म्हणाले, "इतका चांगला ताजमहल बांधू शकतात, तर जागाच जागा होती. दुसरीकडे त्यांनी मशिद बांधली असती. पण मशिद बांधणं हे त्यांचं उद्दिष्ठ नव्हतं. तेव्हाच्या भारतीय समाजाचा तेजोभंग करायचा हा उद्देश होता. यानंतर इंग्रजांनीही तेच केलं. म्हणून या देशात आर्य बाहेरून आले अशाप्रकारची थिअरी मांडण्यात आली." हेही वाचा : हिंदुत्वाची शाल पांघरावी लागते हा टोला कोणाला? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात फार मोठे…” "आर्य-द्रविड संघर्षाची थिअरी चुकीची होती" "यानंतर मध्य युरोपातून आर्य संघर्ष करत आले, त्यावेळी द्रविड या भागात राहत होते आणि आर्यांनी द्रविडांशी लढाई केली, द्रविडांना दक्षिण भारतात टाकलं आणि आर्यांनी हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृतीची शहरं तयार केली असा दावा करण्यात आला. म्हणजे ही शहरं युरोपीयन लोकांनी तयार केली, असा प्रयत्न केला. तेच आम्ही अनेक वर्षे शिकत राहिलो. मात्र, आज इतिहासकारांनी संशोधन केलं आणि हे कसं चुकीचं आहे हे आपल्यासमोर आणलं," असंही फडणवीसांनी नमूद केलं.