पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबियांबद्दलची बरीच माहिती समोर आलेली आहे. अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील आणि आजोबा यांच्या तक्रारी आणि जुन्या प्रकरणांचा यानिमित्ताने पुन्हा एकदा उल्लेख होत आहे. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक म्हणून आरोपीच्या कुटुंबियांचा उल्लेख होतो. त्यांच्या कंपनीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लक्झरी क्लब्स, हॉटेल्स आणि गगनचुंबी आलिशान इमारती बांधल्या आहेत. अल्पवयीन आरोपीच्या पणजोबांनी १९८० च्या दशकात बांधकाम निर्माण कंपनीची स्थापना केली होती. आज या कंपनीचा पसारा संपूर्ण पुण्यात पसरला असून त्यांच्याकडे शेकडो कोटींची संपत्ती एकवटली आहे. अल्पवयीन आरोपीच्या पणजोबांनी १९८० च्या दशकात कंपनीची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या कपंनीने पुण्यात पंचतारांकित क्लबची निर्मिती केली. २००० सालापासून कंपनीने पुण्यातील कल्याणी नगर, वाघोली आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात निवासी प्रकल्पांची उभारणी केली. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या कुटुबांच्या कंपनीचे मूल्य ५०० ते ६०० कोटींचे असल्याचे सांगितले जाते. पुणे पोर्श कार अपघात प्रकरण : अंजली दमानियांनी अजित पवारांना विचारले पाच प्रश्न; म्हणाल्या “शुल्लक गोष्टींवर…” २००० च्या दशकात आरोपीच्या कुटुंबाच्या मूळ कंपनीचे विभाजन झाले. अल्पवयीन आरोपीचे आजोबा आणि त्यांच्या बंधूमध्ये कंपनीचे विभाजन झाल्यांतर आरोपीच्या आजोबांनी निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पाव्यतिरिक्त पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडेही आपला मोर्चा वळविला. पोर्श कार अपघात झाल्यानंतर विभाजन झालेल्या दुसऱ्या कंपनीने आरोपीच्या कुटुंबाच्या कंपनीचा आणि त्यांच्या संबंध नसल्याचा दावा करणारे पत्रक काढले होते. सध्या आरोपीच्या कुटुंबाच्या कंपनीमार्फत पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील इतर भागामध्ये व्यावसायिक प्रकल्पांचे काम सुरू आहे. नुकतेच वाघोली येथील एका जमिनीचा व्यवहारही त्यांनी केला होता. अपघात झाल्यानंतर कंपनीचे संकेतस्थळ आणि लिंक्डिन प्रोफाइल बंद करण्यात आले आहे. “मी शांत बसणार नाही, सगळ्यांना उघडं पाडेन”, पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपीच्या नमुन्यात फेरफार करणाऱ्या डॉक्टरची धमकी! आरोपीचे कुटुंब आणि वाद हे समीकरण नवीन नाही. अपघातानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय भोसले यांनी आरोपीच्या आजोबांवर आरोप केले होते. आरोपीच्या आजोबाचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्यांनी माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप भोसले यांनी केला. तसेच जमीन बळकावल्याचेही आरोप आरोपीच्या कुटुंबियांवर आहेत, मात्र ते अद्याप सिद्ध झालेले नाहीत. सीबीआयकडून अगरवाल कुटुंबाला मागील प्रकरणात क्लीन चीट दिलेली आहे, असा युक्तिवाद आजोबाच्या वकिलांनी न्यायालयात केला.