पुणे : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाचे पंचनामे तत्काळ सुरू करावेत, असे आदेश महसूल, कृषी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पशुसंवर्धन आदी विभागांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती, इंदापूर तालुक्यांतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी सोमवारी केली होती. त्यावेळी तातडीने पंचनामे करण्याची सूचना त्यांनी केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्जन्यमानाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि घडलेल्या घटनांबाबत तत्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असून, त्याचा हेल्पलाईन क्रमांक ०२०- २६१२३३७१, २६१३३५२२ आणि मोफत दूरध्वनी क्रमांक १०७७ आहे.