अजून आठवते..  प्रा. नीला कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रा. नीला कदम यांनी १९९७ ते २००७ या कालावधीत शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले. 

सामाजिक काम करताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांतभाऊ सुतार यांनी आग्रह केल्यामुळे अनपेक्षितपणे मी १९९७ मध्ये राजकारणात आले. निवडणूक लढवून विजयीदेखील झाले. निवडणूक खर्चाला पैसे हवेत म्हणून त्या वेळी आम्ही शेतजमीन विकली होती. नंतर २००२ मध्ये पुन्हा एकदा निवडणूक लढविताना पाच वर्षे केलेल्या कामाच्या जोरावर विजयी होईन हा आत्मविश्वास होता, पण निवडणूक म्हटलं की पैसे हे लागतात. अजून तिकीटही जाहीर झाले नव्हते. एका सकाळी आयडियल कॉलनीत राहणारे गद्रेकाका तीन जिने चढून घरी आले. त्यांनी दहा हजार रुपये असलेले पाकीट टेबलवर ठेवले. ‘मी पैसे परत करू शकणार नाही. त्यामुळे मला हे पैसे नकोत’, असे त्यांना सांगितले. ‘हे बघ पोरी, परत मागायचे असते तर मी तुला पैसे दिलेच नसते. पैसे परत करायचे तर तुला ‘वेगळे’ मार्ग शोधावे लागतील. हे मला पटणार नाही’, असे सांगत गद्रेकाका यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. हा प्रसंग मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.

मी मूळची कसबा पेठेतील झांबरे-पाटील घराण्यातील मुलगी. वडील काँग्रेस विचारांचे होते. खासदार झाल्यानंतर संजय गांधी पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी आमच्या घरी भेट दिली होती. उच्च शिक्षण घेतल्यानंतर मी श्री शिवाजी मराठा संस्थेच्या जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय येथे मराठी विषयाची प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ज्येष्ठ संगीतकार राम कदम यांचे पुत्र विजय कदम यांच्याशी माझा विवाह झाला. आम्ही दोघेही प्रत्यक्ष राजकारणात नसलो तरी सामाजिक कामे करीत होतो. १९९७ मध्ये मी पीएच. डी. साठी प्रवेश घेतला होता. मात्र, आम्ही राहात असलेला शीलानगर कॉलनी हा वॉर्ड महिला राखीव झाल्यामुळे शशिकांत सुतार यांनी मला राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा सल्लावजा आदेश दिला. निवडणुकीचा अर्ज भरला. युती असली तरी श्रुती घाटपांडे या भाजपच्या बंडखोर आणि काँग्रेसच्या साधना वर्तक अशा तिरंगी लढतीत माझा विजय झाला. माझ्या प्रचाराच्या वेळेस किमान ५० सुशिक्षित महिला माझ्या फेरीत असायच्या. महापालिका कामकाजाची माहिती करून घेतली. प्रशासनातील अधिकारी तातडीने भेट देऊन प्रश्न सोडवीत असत. त्यामुळे मुलांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होऊ न देताही मी राजकारणात यशस्वी होऊ शकले.

२००२मध्ये मी विजयी झाले.  ज्येष्ठ नागरिकांना हेलपाटे मारायला लागू नयेत याची मी प्रामुख्याने दक्षता घेतली होती. शिवसेनेची अभ्यासू नगरसेविका अशी माझी ओळख झाली होती. २००७ च्या निवडणुकीमध्ये संपर्कनेते रवींद्र मिर्लेकर यांनी मला पुन्हा निवडणूक लढवावी, असे सुचविले होते. मात्र, कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी मी त्यांना नम्रपणे नकार दिला.

(शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former corporator prof nilima kadam political journey
First published on: 24-01-2017 at 02:58 IST