नवीन मराठी चित्रपट नाही आणि लक्षात राहील असे गाणेही नाही, असा एक काळ मराठी चित्रपटसृष्टीने पाहिला. मात्र, किशोर कदम यांचा सहभाग असलेले ‘नटरंग’, ‘जोगवा’ ते अलीकडच्या ‘देऊळ’, ‘बालक-पालक’ असे काही चित्रपट मराठीत आले, ज्यामुळे मराठीचे चित्र पालटले. आज हिंदूी चित्रपटसृष्टीला तितक्याच ताकदीने टक्कर देण्याची क्षमता मराठीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोसरी येथे बोलताना केले.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान व लायन्स क्लब, भोजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अंकुशराव लांडगे नाटय़गृहात आयोजित राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवात थोरातांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना ‘गदिमा जीवनगौरव’ तसेच ‘सौमित्र’ किशोर कदम यांना ‘गदिमा काव्यप्रतिभा’ पुरस्कार देण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल अध्यक्षस्थानी होते. गदिमा प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त श्रीधर माडगूळकर, संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले, उद्योजक अशोक आहेर, विक्रांत जाधव आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले,‘‘गदिमांचे साहित्य आदर्शवत होते. गीतरामायणाने संपूर्ण महाराष्ट्राला जणू वेड लावले होते. द.मा, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांनी कथाकथनाच्या माध्यमातून रसिकांना खूप आनंद दिला. मंत्री झाल्यानंतर आवड असूनही साहित्यातील अशा अनेक गोष्टींच्या आनंदापासून वंचित रहावे लागते.’’  मिरासदार म्हणाले,‘‘ गदिमांशी अनेक वर्षे स्नेह होता. सर्वच क्षेत्रात संचार करणाऱ्या गदिमांचे एक युग होऊन गेले. त्यांच्या साहित्यात वैविध्य होते. प्रचंड शब्दसामथ्र्य असलेल्या गदिमांचा खरा पिंड कवीचा होता, त्यांना ईश्वरी देणे होते.’’ गोयल म्हणाले,की कवी समाजमनाचा आरसा असतो. प्रास्ताविक सदाफुले यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. मुरलीधर जाधव यांनी आभार मानले.