पुणे :‘ वैभवशाली परंपार असलेल्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत लवकर सहभागी होण्यावरुन निर्माण झालेला प्रश्न सामोपचाराने सोडविला जाणार आहे. मानाचे किंवा अन्य मंडळांमध्ये मतभेद नाहीत. विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वयाने तोडगा काढण्यासाठी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार असल्याचे मानाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जाहीर केले. पुणे पोलीस आयुक्तालयात आगामी गणेशोत्सवाच्या पाार्श्वभूमीवर मंडळाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. त्या वेळी मानाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीणसिंह परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नितीन पंडीत, विकास पवार, केसरी गणेशोत्सव ट्रस्टचे अनिल सपकाळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन, हुतात्मा बाबू गेन मंढळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्रमुख मंडळांचे पदाधिकारी श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, संजय बालगुडे, श्रीकांत भिसे, पुष्कर तुळजापूरकर, सुनील कुंजीर, विशाल गुंड, आनंद सगरे या वेळी उपस्थित होते.

यंदा विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळाने मानाची मंडळाची मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर बेलबाग चौकमार्गे मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीतील सहभागी होण्यावरुन भूमिका जाहीर केली. गणेशोत्सवातील नियोजन, कार्यकर्त्यांसी संवाद साधण्यासाठी आलेल्या पोलीस आयुक्यालयात दोन बैठकांचे आयोजन करण्यात आले.

एक मंडळ एक ढोल पथक’

पोलीस आयुक्यालायात पार पडलेल्या पहिल्या बैठकीत विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोदविला. मानाच्या पाच मंडळांना आणि अन्य मंडळांना पोलिसांकडून वेगळा न्याय दिला जातो. वेळेत मिरवणूक आटोपण्यासाठी पोलिसांनी मिरवणुकीमध्ये ‘एक मंडळ एक ढोल पथक’ हा नियम लागू करावा. मानाच्या मंडळांसाठी पोलिसांनी केळकर, कुमठेकर, तसेच टिळक रस्त्यावरील मंडळांची अडवणूक करू नये. विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ सकाळी सात वाजता करण्यास परवानगी द्यावी, तसेच लक्ष्मी रस्त्यावर आणखी मंडळांना परवानगी देऊ नये, गणेशोत्सवात बेलबाग चौक ते नाना पेठ हा रस्ता बंद न करता सुरू ठेवावा, अशी मागणी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन बैठका झाल्या. बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मिरवणुकीतील क्रमांकाबाबत पोलीस स्वतःहून कोणताही निर्णय घेणार नाही. जी परंपरा, प्रथा आहे, ती अबाधित रहावी. पोलिसांच्या दृष्टीने सर्व मंडळ सारखीच आहेत. त्यामुळे सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन विसर्जन मिरवणुकीबाबत निर्णय घ्यावा. त्यानंतर पोलिसांकडून पुन्हा एकत्रित बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. – अमितेशकुमार, पोलीस आयुक्त

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई मंडळ निर्णयावर ठाम

मंडळांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मिरवणुकीचा प्रारंभ दुपारी चार वाजता होणार आहेे. मानाच्या मंडळांमधील ढोल पथकांची संख्या यंदा कमी करण्यात येणार आहे. त्यानुसार विसर्जन मिरवणुकीतील सहभागी मानाची मंडळे दुपारी दोनच्या सुमरास बेलबाग चौकातून मार्गस्थ होतील. बेलबाग चौकातून मानाची पाच मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर आम्ही लगेचच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळ बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या मिरवणुकीचा प्रारंभ दुपारी चारच्या सुमारास होईल. त्यामुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे पुनीत बालन आणि अण्णा थोरात यांनी नमूद केले.

गणेशोत्सव मंडळांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. विसर्जन मिरवणुकीबाबत विचारविनमय करण्यासाठी सर्व प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येत्या दोन दिवसांत आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर मिरवणुकीबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य देणे ही मंडळांची प्रमुख भूमिका आहे.- श्रीकांत शेटे, अध्यक्ष, श्री कसबा गणणपती मंडळ