‘वामन, कुठे आहेस’ एक दिवस आलेला दूरध्वनी.. ‘मी दिल्लीमध्येच एनएसडी कार्यालयातच आहे’, असे माझे उत्तर.. २० मिनिटांमध्ये येतो असे म्हणाल्यानंतर १८ व्या मिनिटाला पोहोचलेले गोपीनाथराव.. स्वीय सहायकाकडे मोबाइल देऊन ‘एनएसडी संचालकाबरोबर माझा फोटो काढ’ असे सोडलेले प्रेमाचे फर्मान.. तीन तास फिरून पाहिलेला एनएसडीचा कोनाकोपरा.. ‘‘वामन, दिल्लीत आपले सरकार आले आणि महाराष्ट्रात येऊ घातलेय. तुझी इथली मुदत संपली की राज्यात यायचे. ‘एनएसडी’च्या धर्तीवर आपल्याला राज्यात ‘आंतरराष्ट्रीय नाटय़ विद्यालय’ साकारायचे आहे..’’ महाराष्ट्रासाठी मोठी स्वप्नं पाहणारा हा लोकनेता आपल्यात नाही हे महिनाभराने जाणवते’ अशा शब्दांत राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे यांनी गोपीनाथ मुंडे या ज्येष्ठ मित्राच्या आठवणी जागविल्या.
गोपीनाथ मुंडे यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित ‘राजकारणाबाहेरचे गोपीनाथ मुंडे’ या विषयावरील चर्चासत्रात केंद्रे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे आणि खासदार अनिल शिरोळे यांनी सहभाग घेतला. प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्रबुद्धे, कार्यकारी संचालक रवींद्र साठे, अरुणा कोण्णूर या प्रसंगी उपस्थित होत्या.
नाटक, चित्रपट, साहित्य, लोककला यांविषयी प्रेम आणि सांस्कृतिक संवेदना प्रगल्भ असलेला नेता अशा शब्दांत मुंडे यांचे वर्णन करून केंद्रे म्हणाले, बीडमधील छोटय़ा गावात वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित भारुड महोत्सवात गळ्यात टाळ घेऊन वारक ऱ्यांसमवेत मुंडे नाचले होते. दुसऱ्या वर्षी विनय आपटे यांच्यासमवेत त्यांनी उद्घाटन केले. यंदा महोत्सवात विनय आपटे यांच्याविषयी भरभरून बोलणारे मुंडे पुढच्या वर्षी आपल्यामध्ये नसतील ही कल्पना देखील सहन होत नाही. सामान्यांच्या वेदनेशी नाळ जोडणारा हा लोकनेता खुल्या दिलाचा माणूस होता.
कामाच्या निमित्ताने झालेल्या भेटीतून आमचा स्नेह वाढला. मातीतून आलेले आणि मातीशी जोडलेले नेतृत्व, सामान्य घरात जन्माला येऊनही आभाळाखाली झोपणाऱ्यांसाठी काम करणारे आभाळाएवढे कर्तृत्व अशा शब्दांत गिरीश प्रभुणे यांनी मुंडे यांचे व्यक्तित्व उलगडले. अनिल शिरोळे म्हणाले, १९८० ते १९९२ या कालावधीत मुंडे यांचे नेतृत्व घडताना मी त्यांच्यासमवेत होतो. त्यांनीच माझ्या मनात राजकारणाची गोडी निर्माण केली. परळी येथील साहित्य संमेलनाच्या काळात आलेल्या संकटांवर मुंडे यांनी केलेली मात या आठवणींना मिरासदार यांनी उजाळा दिला. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र साठे यांनी आभार मानले.