पुणे : ‘मी चार वेळा ‘ईव्हीएम’वर निवडून आले. त्यामुळे ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, असे मी कसे म्हणू,’ असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी बारामती येथे केले. अनेक ठिकाणी लोकांचे म्हणणे आहे की, त्यांची मते दुसरीकडे गेली आहेत. त्यामुळे सरकार पारदर्शीपणे काम करत असेल तर, ‘ईव्हीएम’ काय किंवा ‘बॅलेट’ पेपर वर निवडणूक घेण्यास सरकारला काय अडचण आहे, अशी विचारणाही त्यांनी केली. बारामती तालुक्यातील विविध गावांचा दौरा गुरुवारी सुळे यांनी केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.

हेही वाचा >>> पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बारामती विधानसभा निवडणूक लढविलेले राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना मतपडताळणी करू नका, असे मी सांगितले होते. ते एकाच उमेदवाराबाबत होते. खडकवासल्याचे उमेदवार सचिन दोडके यांच्याशीही मी चर्चा केली होती. मी स्वत: चारवेळा ईव्हीएमवर निवडून आले आहे. त्यामुळे त्यात घोटाळा आहे, असे मी कसे म्हणू शकेन,’ असे सुळे यांनी सांगितले. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेऊन राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी मतमोजणी पडताळणीसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय घेतला जात असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पराभूत उमेदवारांची दिल्ली येथे गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती. मात्र, त्यानंतर युगेंद्र पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने आणि आता सुप्रिया सुळे यांनी हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.