पुणे : हिंजवडी आयटी पार्कमधील समस्या सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी गेल्या आठवड्यात संयुक्त पाहणी करून बैठक घेतली. या बैठकीत १५ जूनपर्यंत उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. आता ही मुदत संपल्यानंतर सोमवारी शासकीय यंत्रणांनी पुन्हा आयटी पार्कची पाहणी केली. यानंतर उपाययोजनांचे निर्देशही पुन्हा दिले आहेत. यामुळे शासकीय यंत्रणांकडून प्रत्यक्षात उपाययोजना कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आयटी पार्कमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी गेल्या आठवड्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासह (एमआयडीसी) इतर शासकीय यंत्रणांकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर झालेल्या बैठकीत ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन उपाययोजना करण्यासाठी १५ जूनची मुदत दिली. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा सोमवारी पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांनी अधिकाऱ्यांसह आयटी पार्कची संयुक्त पाहणी केली.
या पाहणीनंतर हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनमध्ये या अधिकाऱ्यांनी विविध शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत आयटी पार्कमधील टप्पा एक, दोन आणि तीन तसेच मेट्रो मार्गासह परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ते दुरुस्ती आणि नागरी सुविधांबाबत उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले.
आयटी पार्कमधील प्रमुख उपाययोजना
पावसाच्या पाण्याचा निचरा : डॉल्फिन आणि साई प्रोविजो इमारतीजवळ पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाणार.
राडाराडा व्यवस्थापन : मेट्रो मार्गासह परिसरात पडलेला राडाराडा त्वरित हटवून योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे निर्देश.
प्रदूषणविरोधी कारवाई : नैसर्गिक नाल्यात प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाईसाठी आदेश.
नैसर्गिक नाले खुले करावेत : बंद केलेले नैसर्गिक नाले खुले करत मार्गातील राडारोडा दूर करावा. सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता आणि दुरुस्तीचे आदेश.
आयटी पार्कमधील पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी एमआयडीसीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही ठिकाणी सांडपाणी वाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. याचबरोबर पावसाच्या पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणाऱ्या दोन बांधकाम प्रकल्पांना काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नितीन वानखेडे, मुख्य अभियंता, एमआयडीसी
आयटी पार्कमधील नागरी सुविधांबाबत प्रत्येक शासकीय विभागावर स्वतंत्रपणे जबाबदारी देण्यात आली. सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा संयुक्त पाहणी आणि बैठकांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. या प्रकरणी येत्या बुधवारी आढावा बैठक घेऊन आयटी पार्कमध्ये केलेल्या उपाययोजनांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
शासकीय यंत्रणांकडून आयटी पार्कमधील पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास या उपाययोजना पुरेशा ठरणार नाहीत. नैसर्गिक जल प्रवाहांवरील अतिक्रमण करून झालेली बांधकामे पाडून त्यांचे पुनरूज्जीवन केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.रवींद्र सिन्हा, हिंजवडी आयटी रेसिडंट्स वेल्फेअर असोसिएशन