पुणे: अल्पवयीन मुलांनी किराणा माल व्यापाऱ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना खडकी भागात घडली. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात किराणा माल व्यापाऱ्याचा खून किरकाेळ वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आशिष रमेश कांबळे (वय ३५, रा. अरुणकुमार वैद्य वसाहत, खडकी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा अल्पवयीन मुले आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून प्रकरणात १४ आणि १७ वर्षांच्या दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कांबळे यांचा मामेभाऊ प्रवीण मधुकर गायकवाड (वय ४८) यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे खडकीतील सुरती मोहल्ला परिसरातील अरुणकुमार वैद्य वसाहतीत राहायला आहेत. या वसाहतीत कांबळे यांचे किराणा माल विक्रीचे छोटे दुकान आहे.

हेही वाचा >>> पुणे: महिलेवर बलात्कार प्रकरणी सनदी लेखापाल अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांबळे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वसाहतीतील स्वच्छतागृहात गेले होते. त्या वेळी चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. कांबळे यांच्या डोक्यात सिमेंटचे गट्टू मारण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या कांबळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात किरकोळ वादातून कांबळे यांचा खून झाल्याची माहिती मिळाली असून पोलीस उपनिरीक्षक सुडगे तपास करत आहेत.