इंदपूर/बारामती : पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात रविवारी पावसाने थैमान घातले. जोरदार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही ठप्प झाली, तर इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्याला पावसाने झोडपल्याने काढणीला आलेला भुईमूग, उतरणीला आलेला आंबा, भाजीपाल्यासह पिके आणि फळबागांना मोठा फटका बसला.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या पूर्व भागात सातत्याने पाऊस सुरू आहे. मात्र, रविवारी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. इंदापूर आणि भिगवण येथील आठवडे बाजाराला त्याचा फटका बसला. भिगवण बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाहण्यास सुरुवात झाली. विक्रेते आणि बाजार करणाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. शासकीय रुग्णालयाच्या आवारातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.

भिगवण बस स्थानक परिसरात दोन फूट पाणी साचल्याने प्रवासी स्थानकातच अडकून पडले. इंदापूर आणि दौंड तालुक्याच्या हद्दीतील स्वामी चिंचवलीनजीक पुणे-सोलापूर महामार्गावर पावसाचे पाणी साचल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप आले. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

या पावसामुळे काढणीला आलेला उन्हाळी भुईमूग, उतरणीला आलेला आंबा, भाजपाला, पिके, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेत-शिवारातील सर्व कामे गेल्या चार दिवसांपासूनच्या पावसामुळे खोळांबली असून, शेतकऱ्यांना जनावरांसाठी शेतातून चारा आणण्यासाठी बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. दरम्यान, नीरा नदी दुथडी भरून वाहिल्याने ठिकठिकाणच्या बंधाऱ्यांपाशी बॅरॅकेड लावण्यात आले आहेत. काही गावांमध्ये नीरा नदीचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बारामती तालुक्यातही मुसळधार

बारामती तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, शेती पाण्याखाली गेली आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे संसारोपयोगी साहित्यासह धान्याचे मोठे नुकसान झाले. ओढे, नाले, विहिरी तुडुंब भरून वाहत असून, शेतांना तळ्याचे रूप आले आहे.

गेल्या ४० वर्षांत मे महिन्यात प्रथमच एवढा पाऊस पडल्याचे ज्येष्ठ नागरिकांकडून सांगण्यात आले. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न या पावसाने निर्माण केला आहे. आडसाली ऊसशेती अडचणीत आली असून, एक जुलैऐवजी १५ जुलैला ऊस लागण करण्याला परवानगी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, पावसामुळे नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. सोरटेवाडी, कर्चेवाडी, पवारवस्ती, कुलकर्णीवस्ती, शेंडकरवाडी, साळोबावस्ती, कारंडेमळा परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेले. पावसाच्या पाण्याने धान्यासह इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले. सोमेश्वरनगर, मुरूम, वाघळवाडी, वाणेवाडी, होळ, करंजे, करंजेपूल, निंबूत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, सोरटेवाडी, मगरवाडी, सोमेश्वरमंदिर, चौधरवाडी, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, आठफाटा या भागांत तसेच वाड्या-वस्त्यांवर जोरदार पाऊस झाला.

पिंपळीत कालवा फुटला

बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी नीरा डावा कालवा रविवारी फुटला. कालव्यातील पाणी शेतात घुसल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग कालव्यातील आणि पावसाचे पाण्यामुळे बंद झाला. या महामार्गावरील पाणी अत्यंत वेगाने बारामतीतील जळोचीकडे घुसले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्याही घटना घडल्या. काटेवाडी, पिंपळी, लिमटेक परिसरातील पाणी शेतामध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचा संसार पाण्यात वाहून गेला, तर विहीर आणि नाले उसळून वाहत होते. रायतेमळा परिसरात फुटलेल्या कालव्यामुळे सणसर गावात पूरस्थिती निर्माण झाली. सूर्यनगरी, संभाजीनगर आणि अन्य भागांतील पाणी ओढ्यास मिळाले. तसेच पावसामुळे ओढ्यास पूर आल्याने रहिवाशांना तात्पुरता आसरा घेण्यासाठी अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले.

नारायणगावातही पाऊस

नारायणगाव आणि परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम दिसून आला. जेजुरी आणि परिसरातही सातत्याने पाऊस असल्याने खंडोबा गडावर आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दौंड तालुक्यात ९४ मिलीमीटर पाऊस

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. त्यामुळे गावांचा तसेच वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला. पावसात एक इनोव्हा गाडीही वाहून गेली. ‘स्वामी चिंचोली येथील पावसाची जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागानेही नोंद घेतली आहे. ‘एनडीआरएफ’चे एक पथक गावाच्या दिशेने पाठविण्यात आले आहे,’ अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख विठ्ठल बनोटे यांनी दिली.