पुणे : ‘साहित्यिकांनी सत्तेपुढे नतमस्तक होऊ नये,’ अशी अपेक्षा प्रसिद्ध हिंदी कवयित्री-लेखिका डाॅ. सविता सिंह यांनी सोमवारी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ. सविता सिंह यांच्या हस्ते विशेष ग्रंथकार आणि वार्षिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. परिषदेचे अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

सिंह म्हणाल्या, ‘साहित्यिकांचे कार्य सृजनात्मक असते. एखाद्या प्रसंगाची अनुभूती साहित्यिकाला अस्वस्थ करते. अशा प्रसंगात यथार्थवाद आणि कल्पनेची सांगड घालत आजच्या काळात स्पष्टपणे विचार मांडणारी साहित्यकृती निर्माण करणे आवश्यक आहे. विविध जात, धर्म, पंथ, भाषा यांची भिन्नता असल्याने आपल्या समाजाची विचारधारा ही जगातील इतर विचारधारांपेक्षा स्वतंत्र आहे. ही भिन्नता नष्ट करणाऱ्या वृत्तीस साहित्यकृतीतून विरोध व्हावा. लेखनातील स्वायत्तता जपताना साहित्यिकांनी सत्तेपुढे नतमस्तक होऊ नये.’

‘भाषा असल्याने माणूस प्रगत आहे. या भाषेच्या उपयोजनातून निर्मिलेल्या साहित्यातून स्वातंत्र्य आणि बंधुभाव या मूल्यांचा विस्तार सातत्याने व्हायला हवा. असहिष्णू वृत्ती कधीही प्रगतीचे लक्षण होऊ शकत नाही,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भाषा जाणत असल्याने माणूस प्रगत हा समज चुकीचा असून, इतर जीवांच्याही भाषा आहेत. परंतु. त्या समजण्यास मनुष्यप्राणी कमी पडत आहे,’ याकडे लक्ष वेधून डॉ. सिंह म्हणाल्या, ‘माणसाच्या उत्क्रांतवादात साहित्यिकांचा मोठा वाटा आहे. परंतु, निसर्गाचे ऋण न फेडता भोगवादी संस्कृतीच्या आहारी जाऊन माणूस स्वत:ला उद्ध्वस्त करत आहे. असहिष्णुता पराकोटीला पोहोचल्यास त्याचा परतीचा प्रवास सुरू होईल. समाजात स्त्रीला योग्य मान-सन्मान, न्याय देण्याची गरज आहे. तिच्याकडे चेतना आणि नवनिर्मिती करण्याची क्षमता आहे. साहित्यिकाने आपली व्यक्तिगत मौलिकता जपत जागरूकतेने, सहृदयतेतून सहिष्णू समाजाची निर्मिती करण्यास सहकार्य करावे.’ कसबे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. जोशी यांनी प्रास्ताविकामध्ये परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अंजली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.