मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी सकाळी वाहतूक कोंडी पहायला मिळाली. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक नियोजन करताना प्रशासनचा कस लागत आहे.
आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती आणि इस्टर संडे अशा चार दिवस सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभुमीवर मुंबईकर मोठ्या संख्येने मुंबईबाहेर निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढली. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सकाळपासून खालापूर टोल नाका ते लोणावळा एक्झिट दरम्यान वाहतूक संथगतीने सुरु आहे. त्यामुळे या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. घाटपरीसरात बंद पडणारी वाहने या परिस्थितीत अधिकच भर टाकत आहेत.
वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच बेशिस्त वाहनचालक लेन शिस्त पाळत नसल्यानेही वाहतुकीवरचा ताण वाढतो आहे. काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामेही सुरु आहेत. त्यामुळेही वाहतुकीचा वेग मंदावत आहे.