रिक्षाचालक-मालक संघटनेच्या विविध मागण्यांसाठी १७ जूनच्या मध्यरात्रीपासून ते २० जूनपर्यंत मुंबईत बंद आंदोलन करण्यात येणार असून या काळात राज्य शासनाने ‘मेस्मा’ लागू करून दबावतंत्र वापरल्यास राज्यभरातील १५ लाख रिक्षाचालक संपावर जातील, असा इशारा संयुक्त कृती समितीचे नेते शरद राव यांनी पिंपरीत दिला.
रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरीत चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यासाठी शहरात आलेल्या राव यांनी पत्रकार परिषदेत समितीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे उपस्थित होते.
राव म्हणाले, १५ लाख कुटुंबीयांचा उदरनिर्वाह रिक्षांवर अवलंबून असून त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारण्यात आला आहे. रिक्षाचालक-मालकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घ्यावा, रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, त्यांना सार्वजनिक सेवेचा दर्जा द्यावा, पेन्शन, आरोग्य विमा आदी कल्याणकारी लाभ मिळावेत, रिक्षाचालकांच्या प्रस्तावित कल्याणकारी मंडळात बस, मालवाहतूक, टेम्पो आदींचा समावेश असू नये, अशा समितीच्या मागण्या आहेत. शासनाने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.