पुणे : राज्यात कोविड वाढू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे. मागील वेळेस सगळ्यांनी कर्तव्य बजावत सहकार्य केले होते. आताच्या कोविडमध्ये तीव्रता फार नाही. आम्ही अजून मास्क वापरायला सुरुवात केली नाही. पण आम्हीपण मास्क वापरला पाहिजे ते सत्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मांसाहारी होते, असे विधान केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांनी भाष्य करण्याचे टाळले. राज्यातील मागासवर्ग आयोगावर दबाव नसल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ महिने मुख्यमंत्रीपद आपल्याकडे असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, 'त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत. राज्याच्या प्रमुख पदावर राहण्यासाठी लागणारं बहुमत त्यांच्या पाठिशी आहे.' हेही वाचा : शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाला शनिवारपासून प्रारंभ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिरुर, मावळमध्ये प्रचार मेळावे दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडलेली नव्हती त्यावेळी दादा पक्षात दादागिरी करायचे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, 'मी कामाचा माणूस आहे. सकाळी सहाला कामाला सुरूवात करतो. मी असले आलतू-फालतू उत्तरं द्यायला बांधील नाही. किरकोळ किरकोळ प्रश्न ज्याला काही अर्थ नाही, दोन दिवस चघळायचं-चघळायंच त्याचा चोथा करायचा." हेही वाचा : ऊसतोड कामगारांना ३४ टक्के दरवाढ राष्ट्रवादीचे नेत्या सुप्रिया सुळे या अजित पवारांमुळे निवडून आल्या, यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "निवडून येणाऱ्याला माहितीय कोण कोणामुळे निवडून आलंय अन् निवडून आणणाऱ्यालाही माहितीय कोण कोणामुळे निवडून आलंय.'राज्य मागासवर्गीय आयोगावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, "राज्य मागासवर्गीय आयोग हे स्वायत्त आहे आणि त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही. त्यात आम्ही कुठला ही हस्तक्षेप करत नाही. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तयारी झालेली आहे. महापालिका आणि इतर सगळ्या यंत्रणांना सूचना दिल्या आहेत."