पुणे : घरकामास ठेवलेल्या महिलेने २५ लाख ८० हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना बाणेर भागात घडली. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल केला. स्नेहल गणेश फाळके (वय ३०, रा. सुतारवाडी, पाषाण) असे गु्न्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत विपुलकुमार चाँदकुमार गर्ग (वय ५४, रा. सुप्रीम ॲमाडोर, पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्ग यांनी आरोपी स्नेहल फाळके घरकामास ठेवले आहे. गर्ग आणि त्यांची पत्नी २७ एप्रिल रोजी लखनौत नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी निघाले होते. गर्ग यांच्या पत्नीने कपाट उघडले. तेव्हा कपटातील कप्यात ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. गर्ग दाम्पत्य लखनौला रवाना झाले. विवाह समारंभाहून ते पुण्यात परतले. त्यांनी घरकामास ठेवलेली महिला स्नेहल फाळके हिच्या दोन्ही मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर गर्ग दाम्पत्याने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घराकामास ठेवलेल्या महिलने दागिने चोरल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. तिने सोन्याच्या बांगड्या, हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी, नथ, मंगळसूत्र असा २५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक कराड तपास करत आहेत. पर्वती भागातील मित्रमंडळ काॅलनीत घरकामास ठेवलेल्या महिलेने चार लाख रुपयांचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

संशय का बळावला ?

आरोपी स्नेहल फाळके हिने कृत्रिम नख लावले होते. ती कृत्रिम नख वापरत असल्याने गर्ग यांची पत्नीने तिला अशा प्रकारचे नख वापरु नको, असे सांगितले होते. गर्ग यांनी कपाटातील तिजोरीत दागिने ठेवले होती. ही तिजोरी (डिजिटल कोड) अत्याधुनिक होती. फेब्रुवारी महिन्यात गर्ग यांच्या पत्नीने तिजोरी उघडली. तेव्हा दागिने सुरक्षित होते. २७ एप्रिल रोजी दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दागिने ठेवलेल्या कपाटात कृत्रिम नख सापडले. तेव्हा गर्ग यांच्या पत्नीचा संशय बळावला. त्यांनी घरकामास ठेवलेल्या स्नेहल फाळके हिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा तिचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे उघडकीस आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांचे आवाहन

घरकामास ठेवलेल्या नाेकर, सुरक्षारक्षकांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनेकदा नोकरांचे नाव, पत्ता याबाबतचे कागदपत्रे घरमालकांकडे नसतात. चोरी झाल्याानंतर पोलिसांकडे तक्रार दिली जाते. मात्र, नाव, पत्ता नसल्याने त्यांचा माग काढताना अडचण येते.