पुणे : महसूल विभागांतर्गत सातबारा उतारा, आठ-अ, वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा कमी करणे किंवा चढविणे, ई-करार आणि धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांचे नाव बदलणे या प्रकारच्या सेवांसाठी गावातील भाऊसाहेब म्हणजे तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. तलाठी कार्यालयात न जाताही या सेवांचा लाभ गावकऱ्यांना घेता येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने दिलासा मिळणार आहे.

भूमि अभिलेख खात्याने महाभूमी संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, आठ अ उतारे उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ई-हक्क प्रणालीद्वारे वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा कमी करणे किंवा चढविणे, धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांचे नाव बदलणे आदी कामांसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. मात्र, हे उतारे आणि ई हक्क प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रत्येत नागरिकाकडे संगणक, लॅपटाॅप, इंटरनेट जोडणी आणि प्रिंटर असतोच असे नाही. त्यामुळे आता महा ई सेवा केंद्र, सेतू सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रातून अधिकृतरित्या या सेवा घेता येणार आहेत. त्याकरिता सेवाशुल्कही राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे ही कामे करण्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजविणे आता बंद होणार आहे.

हेही वाचा : भुजबळ-जरांगे वाद शिगेला; राज्य सरकारने कुणबी नोंदींबाबत सर्व जिल्ह्यांना दिल्या ‘या’ सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सेवांसाठी केवळ २५ रुपये शुल्क असणार आहे. वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा कमी करणे किंवा चढविणे, कलम १५५ खालील दुरुस्त्या याकरिता तलाठ्यांकडे अर्ज करावे लागतात. हे अर्ज तलाठी कार्यालयात न करता नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीचा वापर वाढावा, याकरिता शासन प्रयत्नशील आहे. या प्रणालीत अर्ज करताना वापरकर्त्याने महा ई सेवा, सेतू केंद्रचालकाचा क्रमांक न देता स्वतःचा मोबाइल क्रमांक टाकल्यास संबंधितांना त्यांच्या मोबाइलवर अर्जाची प्रगती पाहायला मिळणार आहे, असे अपर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी सांगितले.