राज्यातून उद्योग बाहेर जाण्यासंदर्भात ज्यांना खोटे बोलायचे आहे, ते बोलत आहेत. पण आम्ही त्यांना विकासातून उत्तर देत आहोत. प्रकल्प बाहेर गेले म्हणून टीका करणाऱ्यांनी कोणाच्या चुकांमुळे उद्योग बाहेर गेले हेही सांगावे, अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. लवकरच ४० ते ५० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा >>>पुणे: कोथरुडमधील पतसंस्थेत पावणेदहा कोटींचा अपहार; लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. फिलिप ॲकरमन यांच्यासह जर्मन कंपन्यांच्या शिष्टमंडळाशी सामंत यांनी मंगळवारी पुण्यात संवाद साधला. जर्मनीचे मुंबई येथील महावाणिज्यदूत एकिम फॅबिग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक स्टेफान हालुसा आदी या वेळी उपस्थित होते. जर्मन कंपन्यांना राज्यात विस्तारासाठी आणि नव्याने प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, सवलती पुरवण्याबाबत सामंत यांनी ग्वाही दिली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वेदान्त फॉक्सकॉन कंपनीसोबत सामंजस्य करार झाला नव्हता. सामंजस्य कराराचा दाखला देताना त्यावर स्वाक्षरी आहे का, हेही आरोप करणाऱ्यांनी सांगावे. मुख्यमंत्र्यांनी कुठेही जाऊन चर्चा करण्याची गरज नाही. संबंधित उद्योगसमूहाच्या व्यवस्थापकीय संचालकांनीच यांनीच वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. अडीच वर्षात त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने, मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा न झाल्याने ही कंपनी इंडोनेशियात गुंतवणूक करणार होती. पण आम्ही त्यांना थांबवले. केवळ करार करून काही होत नाही, त्यांची अंमलबजावणीही करावी लागते, असेही सामंत म्हणाले. हेही वाचा >>>पुणे: विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर दाओस येथे होणाऱ्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्र सहभागी होणार आहे. आम्ही तिथे विविध कंपन्यांशी सामंजस्य करार केले जाणार आहेत. उद्योगांना आवश्यक सोयीसुविधा, सवलती दिल्या जातील. त्याून ४० ते ५० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राज्यात येतील हे माझे आश्वासन नाही, तर वचन आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.