आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीमध्ये होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संयोजन समितीने पुरंदर तालुक्याचे भूमिपुत्र आणि दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत यांना आवताण दिले आहे. आमच्याकडून निमंत्रण गेले असले तरी खुद्द रजनीकांत यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते यांनी सांगितले.
अभिनेते रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड हे मूळचे जेजुरीजवळील मावडे कडेपठार या गावचे. एका मुलाखतीमध्ये खुद्द रजनीकांत यांनीच ही माहिती दिली होती. त्यामुळे या गावचे माजी सरपंच हनुमंत चाचर यांनी गावातील गायकवाड मंडळींसमवेत लोणावळा येथे चित्रीकरणासाठी आलेल्या रजनीकांत यांची दोन वर्षांपूर्वी भेट घेतली होती. आपली काय अपेक्षा आहे, असे रजनीकांत यांनी त्यांना विचारताच आपण एकदा गावाला भेट द्यावी एवढीच इच्छा असल्याची भावना चाचर यांनी त्या भेटीमध्ये बोलून दाखविली. आता आपल्या तालुक्यामध्ये साहित्य संमेलन होत असताना या मातीत वाढलेला दिग्गज कलाकार उपस्थित असावा या भावनेतून रजनीकांत यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी यामागची कथा कोलते यांनी सांगितली.
हनुमंत चाचर हे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सहसचिव आहेत. या नात्यानेच त्यांनी संमेलनाच्या लेटरहेडवर या संमेलनाचे निमंत्रण ई-मेलद्वारे रजनीकांत यांना पाठविले आहे. रजनीकांत यांच्याशी माझा अद्यापही संवाद झालेला नाही. मात्र, रजनीकांत संमेलनाला आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही कोलते यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत पुण्यातील साहित्य संमेलनाचा समारोप झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर आता जिल्ह्य़ामध्ये होत असलेल्या संमेलनाला दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत यांना निमंत्रण देत स्वागत समितीने वातावरण निर्मिती केली आहे.