पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एका पबमध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याप्रकरणी भाष्य करत राज्यातील शिंदे-भाजपा सरकारला लक्ष्य केलं आहे. एक्स या समाज माध्यावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – सांगलीवरील वर्चस्वासाठी जयंत पाटील, विश्वजित कदमांमध्ये स्पर्धा

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर पुणे पोलिसांना जाग येऊन त्यांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

पुढे बोलताना, पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत, असेही ते म्हणाले.

भाजपा-शिंदे गटाच्या सरकारवर टीका

‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

हेही वाचा – “आहे हे गमवाल…”, जयंत पाटील समर्थकांचा समाज माध्यमातून काँग्रेस नेत्यांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांकडून पब मालकाविरोधात कारवाई

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पबमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला ताब्यातदेखील घेण्यात आलं आहे. याशिवाय काही पोलीस अधिकाऱ्यांवरदेखील कारावाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, तसेच सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून संबंधित पब पहाटे पाचपर्यंत सुरू असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे.