पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवून खटला चालविण्यात यावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी सोमवारी बाल न्याय मंडळात (जेजीबी) केली.

‘अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून भरधाव मोटार चालविली. या अपघातात दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. मुलाला वाचविण्यासाठी त्याचे बांधकाम व्यावसायिक वडील, आई, तसेच साथीदारांनी कट रचला. ससून रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले. गुन्हा गंभीर असल्याची माहिती अल्पवयीनाला होती. त्यामुळे अपघात करणाऱ्या अल्पवयीनाला सज्ञान ठरवून त्याच्याविरुद्ध खटला चालवावा,’ असा युक्तिवाद ॲड. हिरे यांनी केला.

कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी १९ मे राेजी भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातापूर्वी मोटारचालक अल्पवयीन आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी मुंढव्यातील पबमध्ये पार्टी केली होती. मद्यप्राशन करून ते मोटारीने भरधाव निघाले होते. त्यानंतर अपघात झाला होता. या प्रकरणात अल्पवयीनाला सज्ञान ठरवून त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला चालविण्याची मागणी पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्जाद्वारे केली होती.

बाल न्याय मंडळाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी गरिमा बागडोडिया यांच्यासमोर सरकार आणि बचाव पक्षाकडून सोमवारी अंतिम युक्तिवाद करण्यात आला. या वेळी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त गणेश इंगळे उपस्थित होते. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन, तसेच त्याची आई शिवानी अगरवाल या वेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्पवयीनाकडून ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. ‘अल्पवयीनांचे पुनर्वसन करणे हे बाल न्याय (मुलांची काळजी आणिसंरक्षण) कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मोटारचालक अल्पवयीनाविरुद्ध अन्य कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. अपघाताची घटना दुर्देवी आहे’, असे ॲड. पाटील यांनी युक्तिवादात सांगितले. याप्रकरणी बाल न्याय मंडळात १५ जुलै रोजी निर्णय होणार आहे.