पुण्यात १९६५ साली सुरू झालेल्या किशोर पंप्स प्रा. लि. या कंपनीकडून रसायने, पेट्रो रसायने, ऊर्जा वहन, ऊर्जा निर्मिती, पाणी पुरवठा, सागरी जल, औद्योगिक दूषित पाणी, सांडपाणी प्रक्रिया अशा विविध कामांसाठी लागणाऱ्या पंपांचे उत्पादन केले जाते. खुली अर्थव्यवस्था नसताना आणि माहितीचे स्रोत मर्यादित असताना काळासमोरची आव्हाने पेलत कंपनीने केलेला प्रवास थक्क करणारा आहे. तीस देशांत कंपनीची उत्पादने निर्यात होत आहेत. आता साठहून अधिक देशांत कंपनीची उत्पादने पोहोचली आहेत. अ‍ॅसिड इंडस्ट्रीमध्ये कंपनी भारतात अग्रेसर आहे.

पुण्यातील उद्योग क्षेत्रात एक महत्त्वाचे स्थान निर्माण केलेल्या किशोर पंप्स या कंपनीचे संस्थापक एन. एन. देसाई हे धारावी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात अभियंता म्हणून कार्यरत होते. तेथील आजूबाजूची परिस्थिती अंगावर शहारे आणणारी होती. सांडपाण्याच्या पंपांचा असह्य़ वास येत असल्याने त्या पंपांच्या शेजारीदेखील कोणी जायचे नाही. परिणामी त्या परिसरात अस्वच्छता, दरुगधी होत असे. त्यामुळे ही लोकगंगा आहे आणि तिला स्वच्छ करून देवगंगा बनवेन, अशी प्रतिज्ञा देसाई यांनी केली आणि ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी १९६५ साली किशोर पंप्स प्रा. लि. या कंपनीची स्थापना पुण्यात केली. आज ही कंपनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरण्यायोग्य करण्याच्या क्षेत्रात देशात सर्वात अग्रेसर आहे.

कंपनी स्थापन केल्यानंतर या व्यवसायासाठीची परिस्थिती अनुकूल नव्हती. देशाची अर्थव्यवस्था खुली नसल्याने येणाऱ्या मर्यादा आणि सांडपाण्यावर, औद्योगिक दूषित पाण्यावरील प्रक्रिया याबाबत माहिती मिळविण्याचे स्रोत अत्यंत मर्यादित होते. त्यामुळे सुरुवातीला आव्हानात्मक परिस्थिती होती. पाश्चिमात्य देशांमधून सहकार्य घ्यायचे असल्यास दोन-तीन वर्षांची किचकट प्रक्रिया करावी लागायची. तसेच कंपनीचे स्वत:चे म्हणून काही उत्पादन असेल तर परदेशातील कंपन्या सहकार्यासाठी उत्सुक असत. सुरुवातीची नऊ वर्षे अतिशय कष्टप्रद गेल्यानंतर रासायनिक, हायजेनिक लिक्विड यांमध्ये चांगले काम केल्यानंतर १९७४ पासून कंपनीला परदेशी तंत्रज्ञानाची मदत मिळाली आणि त्यानंतर कंपनीने मागे वळून पाहिले नाही.

कंपनीच्या कार्यक्षेत्राचा त्यानंतर चांगलाच विस्तार झाला. पुण्यात कंपनीचे पिंपरी, चाकण, भोसरी या ठिकाणी तीन प्रकल्प आहेत. याबरोबरच सातारा, कोल्हापूर आणि सांगली जवळील पलूस येथेही प्रकल्प असून नुकत्याच फलटण आणि बडोदा येथे कंपनीने जमिनी घेतल्या असून तेथेही प्रकल्प उभे करण्यात येणार आहेत. आता अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांपैकी काही युनिट धातू ओतण्याचे आहेत आणि काही मोटारींची (पंम्प) निर्मिती करणारी आहेत.

कंपनी स्थापन झाल्यापासून आतापर्यंत एकूण साठ देशांत कंपनीची उत्पादने निर्यात झाली आहेत. सध्या एकावेळी तीस देशात उत्पादने निर्यात होतात. पाण्याच्या पंपासारखे एकसारखे पंप कंपनीकडून बनवले जात नाही तर, कल्पकतेने हे पंप बनवले जातात. त्यामध्ये ग्राहकांची आवड, निकड लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे विशेष रेखाटनकार म्हणून कंपनीचे ग्राहक कंपनीकडे पाहतात. ग्राहकांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार उत्पादनांचे रेखाटन केले जाते. तसेच नवनवी रेखाटने असलेली उत्पादने तयार केली जातात.

सन १९८४ पासून कंपनीचे कामकाज किशोर देसाई पाहात आहेत. त्यांनी धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी संपादन केल्यानंतर यांत्रिक योजना (मेकॅनिकल वर्क फ्रॉम डिझाईन) या विषयात अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांचा पुत्र सिद्धार्थ हाही २०१२ पासून त्यांना या उद्योगात मदत करत आहे. सिद्धार्थने पुण्यातून रासायनिक अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतल्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एम. एस. केले आहे. कंपनीने आतापर्यंत तब्बल चाळीस नवी तंत्रज्ञाने भारतात आणली आहेत. तसेच मुठा नदीकाठावरील सर्व पंपिंग स्टेशन कंपनीची आहेत. मात्र, तेथे प्रक्रिया करण्याचे काम कंपनी करत नाही.

पुण्यातून कालव्यातून बारामती येथे पाणी सोडले जाते. त्या पाण्याला एक प्रकारचा वास येत होता. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाकडून याबाबतचे काम कंपनीकडे देण्यात आले. या पाण्याचा वास दूर करण्याची प्रक्रिया आणि पाणी स्वच्छ करण्याचे काम कंपनीने केवळ आठ दिवसांत केले.

कंपनीला आतापर्यंत अनेक पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये १९७८ मध्ये देशात आयात होणाऱ्या तंत्रज्ञान, वस्तूंना योग्य पर्याय दिल्याबद्दल राष्ट्रपती पदक आणि पर्यावरणाला लागणारी साधनसामग्री, यंत्रे निर्माण करण्याच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१३ मध्ये ‘फ्रॉस्ट अ‍ॅण्ड सुलिव्हन’ हा विशेष पुरस्कार आशिया खंडातून किशोर पंप्स कंपनीला मिळाला असून हा सन्मान जगात खूप कमी कंपन्यांना प्राप्त झाला आहे.

‘कंपनी मेक इन इंडियावर भर देत आहे. जगभरातील ग्राहक आमच्याकडून पंप घेण्यास उत्सुक असतात. कंपनीच्या तंत्रज्ञानाचे पंप देऊन संबंधिताने त्यांच्या नावाने विकण्याची प्रचंड मोठी बाजारपेठ जगात उपलब्ध आहे. त्याकरिता त्याचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे’, असे किशोर देसाई सांगतात. नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कंपनीने स्वत:चे दहा-पंधरा कारखाने चालवायला दिले असून या व्यावसायिकांनी तेथे स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे कोणताही व्यवसाय सुरू करताना आणि सुरू केल्यानंतर काम करणारे हात तयार करण्यापेक्षा काम देणारे हात निर्माण केले पाहिजेत. याबरोबरच न्याय, नीती आणि कायदे पाळून आणि समाज व देशाचा विचार करूनच व्यवसाय करायला हवा, असेही देसाई सांगतात.

सध्या किशोर आणि सिद्धार्थ देसाई हे दोघे मिळून बायोगॅस इंधन पुनर्वापर आणि ऊर्जेची निर्मिती या उत्पादनांवर काम करत असून त्यातील काही उत्पादने तयारही  झाली आहेत. घनकचऱ्यातून निघणाऱ्या गॅसपासून वीज तयार करणारी उत्पादने बनविण्याचे आणि उपाहारगृहातील टाकाऊ पदार्थापासून गॅस तयार करण्याचे शिवधनुष्यही त्यांनी हाती घेतले आहे.