पुणे : ‘अनेक प्रकारच्या सामाजिक प्रवाहांनी, स्थित्यंतरांनी आपले जगणे प्रभावित होत असते. वर्ण, प्रदेश, भाषा अशा कारणांनी समाजात असमानता आढळते. मात्र, मुलांच्या भवितव्यासाठी समाजाने लोकशाही मूल्ये आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी व्यक्त केले.

सह्याद्री प्रकाशनाच्या वतीने अस्मिता जोशी-राजे ‘शिकणारे पालक, घडणारी मुलं’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे, सह्याद्री प्रतिष्ठानच्या संचालक स्मिता देशपांडे, प्रकाशक डॉ. सागर देशपांडे या वेळी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,‘समाजात मिसळल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. दु:खाचा प्रसंग आलेल्या कुटुंबांना आपण भेट देत असतो. त्यांचे सांत्वन करतो. मात्र, त्यांच्या आनंदात, इतर कोणत्याही प्रसंगात कुणीही सहभागी होत नाही. अशा कुटुंबांना समाजात सामावून घ्यायला हवे. त्याने मुलांच्यासमोरचे क्षितिज विस्तारेल. सध्या पालक आणि मुलांच्यातील संवाद कमी होताना दिसतो आहे, तर काही ठिकाणी सुसंवादाऐवजी सांगण्याची सवय मुलांना लागते आहे. पालक आणि मुले यांच्यात खुला संवाद असणे गरजेचे असते.’

डॉ. साठे म्हणाल्या,‘सध्याची शिक्षण व्यवस्था ही बाहेरच्या जगातील बदलांना सर्वांत शेवटी प्रतिसाद देणारी व्यवस्था आहे. अनेक संदर्भ पुस्तकांमध्ये मोबाईल हा शब्द सुद्धा दिसत नाही, तरीही शिकवण्यासाठी तीच पुस्तके वापरली जातात. पालकांना मुलाला घडवायचे असेल, तर त्यांनीही शिकण्याची तयारी ठेवायला हवी. कोणीतरी बाहेरून येईल आणि सगळी परिस्थिती बदलेल असे होणार नाही. पालक आणि समाज म्हणून आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवावे लागतील. आता पालकत्व अधिक जाणून घेण्याची, ते शिकण्याची गरज निर्माण झाली आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. सागर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. अस्मिता जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. स्मिता देशपांडे यांनी आभार मानले.