शिरुर : शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असून, ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. जांबूत गावात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची, तर कान्हूर मेसाई गावातील ढगे वस्ती परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावले आहेत.

जांबूत गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुक्ताबाई भाऊ खाडे (वय ५५) यांचा मृत्यू झाला. मुक्ताबाई रविवारी सायंकाळी बेपत्ता झाल्या. खाडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वन विभागाने त्यांचा शोध घेतला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मुक्ताबाई यांचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. खाडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने जांबूत गावात शोककळा पसरली.

हेही वाचा >>> Pain From Drumming : ढोल-ताशावादनामुळे जडतेय कायमचे दुखणे! आरोग्यतज्ज्ञांचा वादकांना काळजी घेण्याचा सल्ला

शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी निघालेल्या अंकुश खर्डे (वय ६०) या शेतकऱ्याला बिबट्याने लक्ष्य केले. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात खर्डे यांच्या तोंडाला हाताला जखमा झाल्या असून, त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढगे वस्ती परिसरात अंकुश खर्डे राहायला आहेत. ते नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले. त्याच रस्त्यावर त्यांची विहीर असल्याने पिण्याची पाण्याची मोटार सुरू करायला गेले. त्या वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक अंकुश खर्डे यांच्यावर हल्ला केला. खर्डे यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला. या हल्ल्यात खर्डे यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत.

हेही वाचा >>> स्पर्धा परीक्षार्थींना दिलासा… राज्य शासनाकडून ते’ परिपत्रक रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे

वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी जांबूत गाव, तसेच कान्हूर मेसाई परिसरात पिंजरे लावले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुक्ताबाई खाडे आणि जखमी झालेले शेतकरी अकुंश खर्डे यांना शासकीय मदत देण्याचा प्रस्ताव वन विभागाने पाठविला आहे, असे वन अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.