पुणे : जाती-धर्माच्या भिंती तोडण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय आंतरजातीय, आंतरधर्मीय वधू-वर सूचक केंद्र सुरू केले आहे.
‘जात ही एक मोठी अंधश्रद्धा आहे’, असे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत असत. आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात झाले, तर जातिनिर्मूलन लवकर होईल, असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मानत. त्यानुसार गेली अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह लावते. आतापर्यंत असे शेकडो विवाह अंनिस मार्फत राज्यभर लावण्यात आले आहेत. अशा विवाह करणाऱ्या मुला-मुलींसाठी रहिमतपूर (जि. सातारा) येथे महाराष्ट्रातील पहिले सुरक्षित निवारा केंद्र (सेफ हाऊस) सुरू केले आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार ही विविध योजना राबवते.
या केंद्रामध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह स्वच्छेने करणाऱ्या वधू-वरांनी आणि पालकांनी आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन, या केंद्राचे राज्य समन्वयक शंकर कणसे आणि डॉ. ज्ञानदेव सरवदे यांनी केले आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय तसेच विधवा-विधुर विवाह करू इच्छिणाऱ्यांनी आपली माहिती या केंद्राचे समन्वयक शंकर कणसे (मु. पो. पिंपरी, ता. कोरेगाव, जि. सातारा, मो. क्र. ९९२२३५५४३५) आणि डॉ. ज्ञानदेव सरवदे (बारामती, जि. पुणे, मो. क्र ९५२७७२१४७५) यांना पाठवावी. किंवा आपल्या गावातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले आहे.
अशी आहे केंद्राची कार्यप्रणाली
अंनिसच्या या केंद्रामध्ये वधू-वरांनी किंवा पालकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना सुयोग्य स्थळ सुचवले जाते. वधू-वराने आपली माहिती पाठवल्यानंतर त्यांनी जोडीदाराची निवड विचारपूर्वक केली आहे ना, याची पडताळणी केली जाते. सत्यशोधकी तसेच विशेष विवाह नोंदणी कायदा याच्या अंतर्गत विवाह करावा असा सल्ला दिला जातो. नाव नोंदणीची सेवा ही विनामूल्य दिली जाते. समाजामध्ये प्रत्येक जातीची वेगवेगळी वधू-वर सूचक केंद्र आहेत, परंतु, जात धर्म न मानणाऱ्या पालकांना किंवा वधू-वरांना जर आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह स्वच्छेने करायचा असेल, तर त्यांना असे केंद्र कुठेही नाही. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही सोय पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली आहे.