लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सिंहगड रस्त्यावर किरकोळ वादातून दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. सिंहगड क्षेत्रीय कार्यालयासमोर शुक्रवारी (७ मार्च) रात्री ही घटना घडली होती.

याबाबत निशा रवीशंकर पाताळे (वय २७, रा. महादेवनगर, धायरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहेत. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात निशा आणि त्यांचे पती रवीशंकर जखमी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाताळे दाम्पत्य शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरातील क्षेत्रीय कार्यालयाजवळ थांबले होते. क्षेत्रीय कार्यालयासमोर दुचाकीवरुन तिघे जण आले. त्या पैकी एकाने रस्त्याच्या कडेला लघुशंका केली. त्या वेळी रवीशंकर यांनी ‘रस्त्यात लघुशंका का केली? समोर महिला थांबली आहे. दिसत नाही का ? ’, अशी विचारणा केली. त्यानंतर तिघांनी रवीशंकर आणि त्यांची पत्नी निशा यांना शिवीगाळ केली. त्यांना धक्काबुक्की करुन कोयत्याने हल्ला केला. रवीशंकर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याने ते जखमी झाले. त्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पसार झाले.

सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तपास करुन तिघांना पकडले. सहायक पोली निरीक्षक वैशाली भोसले तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोळक्याची परिसरात दहशत

अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींनी शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास राजीव गांधी वसाहतीत कोयते उगारुन दहशत माजविल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्यांनी वडगाव बुद्रुक परिसरात दाम्पत्यावर हल्ला केला होता. सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे तपास करुन पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.