पुणे : ‘अनेक इंग्रजी शब्दांना आजही मराठीमध्ये प्रतिशब्द नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेल्या योगदानानंतर हे काम काहीसे थंडावले आहे. इंग्रजी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्दांचा शोध घेणे गरजेचे आहे,’ असे मत मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी व्यक्त केले.
‘मातृभाषेचा विसर पडत असताना मराठी भाषेचे जतन, संवर्धन करून पुढच्या पिढीला मराठीचे ज्ञान उपलब्ध झाले पाहिजे. जागतिक पातळीवर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गुजर-निंबाळकरवाडी येथील सरहद संस्थेच्या आवारातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यानाचे भूमिपूजन उदय सामंत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. सरहदचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, लेशपाल जवळगे, झाहिद भट, वैभव वाघ, प्रमोद भानगिरे, संतोष बालवडकर या वेळी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे सांस्कृतिक आणि साहित्याची ऊर्जा मिळाली. संमेलनाध्यक्ष आणि स्वागताध्यक्षांची ओळख करून देणारे हे उद्यान देशाच्या इतिहासात नोंद होणारा उपक्रम ठरेल. जोशी म्हणाले, ‘साहित्य संमेलन महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असून, संमेलनाध्यक्षांनी समाजाला वैचारिक दिशा दिली आहे. वाद हे लोकशाही जिवंत असल्याचे उदाहरण आहे. मात्र, सध्या राजकारण, समाजकारण आणि साहित्य -सांस्कृतिक क्षेत्रात विचारांऐवजी केवळ कलह दिसून येत आहे.’
‘उद्यानाच्या माध्यमातून आजवरचे संमेलनाध्यक्ष आणि स्वागताध्यक्षांची माहिती देण्यात येणार आहे. साहित्य, भाषा, कला, संस्कृती यांचा सुंदर मिलाफ साधणारे हे केंद्र ठरेल,’ असे नहार यांनी प्रास्ताविकात सांगितले. काश्मिरी गायिका शमिमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. उद्यानाची उभारणी करण्यामध्ये योगदान देणारे राजेश दुधाणे, किरण भामरे, रणजित पायगुडे, सचिन सानप यांचा सत्कार करण्यात आला.
मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पायाभूत ठरलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या छपाईसाठी ४८ तासांच्या आत एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्ती, संस्थेला राज्य सरकारच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.- उदय सामंत, मराठी भाषामंत्री