पुणे : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या संग्रहातील ग्रंथसंपदेचे जतन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने करण्याची मागणी विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे केली आहे. चितमपल्ली यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती घेऊन, आवश्यक ती कार्यवाही करून त्या ग्रंथसंपदेचे जतन करण्यास विद्यापीठ उत्सुक आहे,’ अशी ग्वाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली.
चितमपल्ली यांची ग्रंथसंपदा विद्यापीठात आणण्याबाबत विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे यांनी कुलगुरूंना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की मारुती चितमपल्ली यांच्याविषयी २० जून रोजी ‘लोकसत्ता’मध्ये ‘एक झाड होते’ हा संपादकीय लेख वाचला. त्यात अरण्यऋषी यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच, चितमपल्ली यांच्याकडे संग्रहातील १५ हजार ग्रंथ ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देऊ इच्छित होते, त्यांनी तसा पत्रव्यवहार विद्यापीठास केला होता; मात्र आपल्याकडून फारशी दाद मिळाली नाही, अशी खंत लेखात व्यक्त केली आहे.
त्यामुळे चितमपल्ली यांच्याकडून झालेल्या लेखी पत्रव्यवहाराची माहिती घ्यावी. तसेच, त्यांच्याकडे उपलब्ध असलेली, विद्यापीठाला देऊ इच्छित असलेल्या ग्रंथसंपदेची खात्री करावी. त्यानंतर तत्काळ विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात संबंधित सर्व ग्रंथसंपदा संग्रहित करण्याची, त्याचे जतन, संवर्धन करण्याची प्रक्रिया सुरू करावी. जयकर ग्रंथालयात हे सर्व ग्रंथ जतन करून ठेवण्यात आल्यास विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधकांना त्याचा उपयोग होईल.
दरम्यान, चितमपल्ली यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती घेतली जाईल. त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही रीतसर पूर्ण करून त्या ग्रंथसंपदेचे जतन करण्यास विद्यापीठ उत्सुक आहे, असे कुलगुरू डॉ. गोसावी यांनी सांगितले.