मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर विजयी झाले, ते जातीयवादी प्रचार झाल्यामुळेच, असे आजपर्यंत मानले जात होते. मात्र, बाबरांचे प्रतिस्पर्धी व राष्ट्रवादीचे उमेदवार आझम पानसरे यांनी साडेचार वर्षांनंतर त्यास छेद दिला आहे. आपल्या विरोधात जातीयवादी प्रचार झाला, असे आपण मानत नाही. मनसेचा उमेदवार रिंगणात नव्हता, हेच आपल्या पराभवाचे कारण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मावळातील बाबर व पानसरे यांच्यातील लढतीत बाबर ८० हजारांच्या फरकाने निवडून आले. त्या वेळी पानसरे यांच्याविरुद्ध जातीयवादी प्रचार झाला होता. ‘अकबरपेक्षा बाबर बरा’ असे एसएमएस शेवटच्या काही दिवसात मोठय़ा प्रमाणात पसरवण्यात आले होते. याशिवाय, अन्य यंत्रणांचा वापरही झाला होता. राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी केलेला विरोधी प्रचार हे पानसरे यांच्या पराभवाचे जसे कारण होते, तसेच जातीयवादी प्रचार हेही तितकेच महत्त्वाचे कारण होते. मात्र, पानसरे यांनी प्रथमच त्याचे खंडन केले आहे. जातीयवादी प्रचार झालेला नाही. मात्र, मनसेचा उमेदवार रिंगणात नाही म्हणून पराभव झाला, असे आपल्याला वाटते. पुण्यात सुरेश कलमाडी यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार होता, त्याने ७५ हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती. मावळ मतदारसंघात मनसेचा उमेदवार नव्हता. तो रिंगणात असता तर निश्चितपणे वेगळा निकाल लागला असता, आपण निवडून आलो असतो, असे पानसरे यांनी म्हटले आहे. मावळात राष्ट्रवादीची ताकद बरीच आहे. तरीही दुर्दैवाने लोकसभेत पराभव झाला. आता पूर्वीपेक्षा ताकद वाढली आहे. पिंपरी पालिकेतील संख्याबळ वाढले आहे. तळेगाव पालिकेत चांगले यश मिळाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2013 रोजी प्रकाशित
मावळात मनसेचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळेच पराभव – आझम पानसरे
आपल्या विरोधात जातीयवादी प्रचार झाला, असे आपण मानत नाही. मनसेचा उमेदवार रिंगणात नव्हता, हेच आपल्या पराभवाचे कारण आहे, असे पानसरेंनी स्पष्ट केले आहे.
First published on: 31-12-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mawal election gajanan babar azam pansare mns