वेगाने माहिती प्रसारित करणारी समाजमाध्यमे ही दुधारी शस्त्र आहेत. मात्र, प्रसारित होणाऱ्या माहितीबाबत खात्री करून घेण्याची यंत्रणा अस्तित्वात नसल्याने गैरसमजच अधिक होतात. परतीच्या पावसाप्रमाणे झोडपून काढत असल्याने समाजमाध्यमे ही आता डोकेदुखी झाली आहेत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. डिजीटल आणि समाजमाध्यमांना वळण आणि शिस्त लावण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसविण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाच्या वतीने अजित पवार यांच्या हस्ते ‘लोकसत्ता’चे राजकीय संपादक संतोष प्रधान यांना वरुणराज भिडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, ‘सामना’च्या मेधा पुंडे-पालकर, ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अलका धूपकर, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे जुन्नर येथील प्रतिनिधी धर्मेंद्र कोरे आणि ‘एबीपी माझा’चे उस्मानाबाद येथील प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनाही आश्वासक पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, विश्वस्त अंकुश काकडे आणि डॉ. सतीश देसाई या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील ऐक्य आणि सलोखा टिकून राहण्यासाठी माध्यमांनी नको त्या मुद्द्याला अनावश्यक महत्त्व देणं थांबवलं पाहिजे. त्यामुळे जातीय ध्रुवीकरण करून भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही, यासाठी समाजमाध्यमांनी बातमी प्रसारित करण्याआधी शहानिशा करणं गरजेचं आहे. मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे आणि आता समाज माध्यमे असे स्थित्यंतर होत असताना पत्रकारितेची मूल्ये हरवणार नाहीत, याची दक्षता घेतली गेली पाहिजे. समाजाच्या ध्रुवीकरणाचा होत असलेला प्रयत्न माध्यमांनी समाजामोर आणला पाहिजे. रिकामटेकड्यांना प्रसिद्धी देऊ नये. विकासासाठी एकजुटीने काम करताना माध्यमांनी केलेल्या विधायक सूचनांचे मनापासून स्वागत करू, असंही ते यावेळी म्हणाले.

भावे म्हणाले की, सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला पडले असून राजकीय पक्ष केवळ आरोप-प्रत्यारोपांमध्येच व्यग्र आहेत आणि ती भांडणं दाखविण्यात माध्यमं गुंतून पडली आहेत. अघोषित हुकूमशाहीविरोधात बोलण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदच का आवश्यक ठरतं?, असा प्रश्न मला पडतो. महाराष्ट्राची घडी विस्कटणार नाही, याची काळजी घेणे ही पत्रकार आणि राजकीय पक्षांची जबाबदारी आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे केंद्रातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन अभ्यासक्रमात प्रथम आलेला रोहित वाळिंबे आणि चालू घडामोडी या विषयात प्रथम आलेला अतिक शेख या विद्यार्थ्यांना अजित पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.