राज ठाकरेंनी शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर २००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आज या पक्षाला १५ वर्ष पूर्ण होऊन, उद्या १६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या मागील १६ वर्षात मनसेने अनेक चढ उतार पाहिले आहेत. पण दरवर्षी मुंबईत होणारा वर्धापन यंदा प्रथमच पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच होत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे उद्याच्या सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले की, “शहरातील मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्याच्या मेळाव्याची जय्यत तयारी केली असून मुंबई बाहेर प्रथमच पुण्यात वर्धापन दिन होत आहे. यामुळे राज्याच्या विविध भागातून मनसैनिक हजर राहणार आहेत. हा वर्धापन दिन राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या लक्षात राहणार आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी ४ वाजल्यापासून मनसैनिक येण्यास सुरुवात करतील. यंदा आम्ही सभेच्या ठिकाणी येणार्या महिलांना पांढरा फेटा घालणार आहोत, तर भगव्या साड्यामध्ये महिला सहभागी होतील. तसेच येणार्या प्रत्येकासाठी लाडू आणि पाण्याची बॉटल देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.” तसेच ते पुढे म्हणाले की, आमच्या पक्षात विविध पक्षातील तरुण वर्ग येण्याची शक्यता जास्त आहे. या निवडणुकीत आम्ही निश्चित निर्णायक भूमिका पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.