पुणे : ‘देश महासत्ता होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. आपल्या देशाला मोठी ज्ञानपरंपरा लाभली असून वेद, योग, पंचांग, संगीत, कला आणि प्राचीन भारतीय विद्यांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात आणखी काही विषय समाविष्ट करण्यात येणार आहेत. सहज-सोप्या भाषाशैलीत त्यांची मांडणी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली.

‘आम्ही सारे ब्राह्मण’ संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. पाटील यांच्या हस्ते पंचांगकर्ते मोहन दाते यांना ‘ब्राह्मणभूषण पुरस्कारा’ने गौरविण्यात आले, तर युवा उद्योजक निर्मल देशपांडे यांना इंदुमती-वसंत करिअर भूषण, हभप किरण कुलकर्णी यांना डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार, शुक्ल यजु:शाखीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेला भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, शुक्ल यजु:शाखीय संस्थेचे जगदीश नगरकर, उद्योजक ऋषिकेश कुलकर्णी, सुनंदा निसळ, संस्थेचे संचालक भालचंद्र कुलकर्णी, संजय ओर्पे, माधुरी कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात ‘ब्राह्मण रत्ने’ या चरित्रकोश ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे, वंदना धर्माधिकारी लिखित ‘यशोगाथा – ब्राह्मण स्त्रियांची’ या पुस्तकाचे आणि ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिके’च्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘देशाने विश्वाला संस्कृती, मूल्य, परंपरा, शिक्षण, ज्ञान दिले आहे. मात्र, बदलत्या काळात या सर्व बाबी नव्याने संक्रमित करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याचे प्रमाण वाढते आहे. आता ज्ञान अधिष्ठान, संस्कृती आणि संस्कार ही मूल्ये समाजात रुजविण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे,’ असे प्रतिपादन अभ्यंकर यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी कुलकर्णी यांनी आभार मानले.