पुणे : नाम फाउंडेशनचे काम नवी पिढी चांगल्या प्रकारे पुढे नेत आहे. संस्थेच्या कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नव्या पिढीने हे काम पुढे न्यावे आणि मला माझ्या पद्धतीने आयुष्य जगू द्यावे, असे सांगत ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनच्या कामातून निवृत्त होण्याचे संकेत रविवारी दिले.
‘मकरंद अनासपुरे यांनी सस्थेचे काम पुढे न्यावे. कान धरायला आणि कौतुक करायला मी सोबत असेनच,’ असे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.
‘नाम फाउंडेशन’च्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नानांनी हे संकेत दिले. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, फाउंडेशनचे संस्थापक, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि सचिव प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे या वेळी उपस्थित होते.
सप्टेंबर २०१५ मध्ये ‘नाम फाउंडेशनची’ स्थापना करण्यात आली. फाउंडेशनची यंदा दशकपूर्ती होत आहे. या वाटचालीत आजवर असंख्य हातांनी माणुसकीच्या या यज्ञात मोठे योगदान दिले. मानवतेचा हा यज्ञ यापुढेही असाच अखंडपणे चालत राहील, यासाठी ‘नाम फाउंडेशन’ कटिबद्ध असल्याचे नानांनी या वेळी सांगितले.
दरम्यान, ‘नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित असून, त्यांच्या या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेत सामाजिक कामासाठी पुढाकार घेतला, तर ही सामाजिक चळवळ नक्कीच समाजात, देशात बदल घडवू शकते,’ असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ‘समस्यांचे रूपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवे,’ असे सांगताना, ‘चांगल्या सामाजिक कार्यासाठी राजकीय प्रचाराची गरज नसते, त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची,’ असे ते म्हणाले. ‘नाम’ने केलेल्या कार्याचे आणि त्यांच्या निष्ठेचे त्यांनी कौतुक केले. ‘देणारे हात होण्यापेक्षा मदत करणारे हात होता आले पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी केले.
‘जेवढ्या जास्त प्रमाणात आपण कौशल्ये निर्माण करू, तेवढे आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहू. त्यासाठी समाजाप्रती संवेदनशील असणाऱ्या प्रत्येकाने आपला खारीचा वाटा आवर्जून उचलायला हवा,’ असेही गडकरी यांनी नमूद केले.