राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये देखील नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकरच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि अटकेचा निषेध नोंदवला. ‘गांधी लढे थे गोरो से, हम लढेंगे चोरो से’, ‘केंद्र सरकार जब-जब डरती है, ईडी को आगे करती है’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

मंत्री नवाब मलिक यांना आज (२३ फेब्रुवारी) ईडीने अटक केली. त्यानंतर राजभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, “ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. केंद्र सरकार अडचणीत आले की सत्तेचा गैरफायदा करते. मलिकांना ईडीने केलेली ही अटक त्याचंच उदाहरण आहे.”

“महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी कारवाई”

“देशात महागाई वाढली आहे, बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता सर्वसामान्यांचे लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे,” असा आरोप देखील अजित गव्हाणे यांनी केला. पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटले होते. त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चौक दणाणून सोडला.

हेही वाचा : “२०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले, पण…”, नवाब मलिकांच्या अटकेनंतर जयंत पाटलांचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर चौकात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.