‘‘सध्याच्या काळात वाचन संस्कृती वाढतच जाणार आहे. मात्र, या वाचकांची भूक भागवण्यासाठी दर्जेदार लेखन होणे गरजेचे आहे.’’ असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी रविवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वार्षिक ग्रंथ व ग्रंथकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य,  प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते. या वर्षी डॉ. यशवंत पाठक, आशुतोष जावडेकर, अनुराधा पाटील, गुरू ठाकूर, प्रकाश तुपे, उमा कुलकर्णी, डॉ. विवेक बेळे यांना देण्यात आला. वार्षिक ग्रंथ पारितोषिक अ‍ॅड. वि. पु. शिंत्रे, अरविंद व्यं. गोखले, छाया महाजन, सुहास मंत्री, डॉ. पां. ह. कुलकर्णी, डॉ. संदीप केळकर, डॉ. मुहम्मद आजम, डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. इंदुमती अरकडी, अन्वर राजन, डॉ. पुष्पा भावे, अमोल वाघमारे, मोहन आपटे, उत्तम कांबळे, सुलभा ब्रह्मनाळकर आणि श्रीनिवास भणगे यांना देण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाटचालीत  योगदान देणारे म. श्री. दीक्षित, डॉ. वि. भा. देशपांडे, ह. ल. निपुणगे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.
डॉ. शेजवलकर म्हणाले, ‘‘गेल्या तीसचाळीस वर्षांपासून साहित्य निर्मितीला चालना मिळाली आहे. शोषित, पीडित वर्गातून उत्तम साहित्य निर्मिती होताना दिसत आहे. साहित्य निर्मितीबरोबरच उत्तम वाचक घडवण्यासाठी ‘गाव तेथे ग्रंथालय’सारख्या योजना अमलात आणणे आवश्यक आहे.’’
विदर्भ, मराठवाडा, गोवा या ठिकाणच्या मराठी साहित्यिकांसाठीही विशेष पुरस्कार ठेवण्यात यावेत, असे मत श्रीनिवास पाटील यांनी या वेळी व्यक्त केले. अरविंद गोखले म्हणाले, ‘‘गडचिरोली येथे होणारे नक्षलवादी हल्ले देशाला वेगळ्या स्तरावर घेऊन जाणारे आहेत. या हल्ल्यांचा पाकिस्तानच्या ‘आयएसआय’शी संबंध असल्याचेही समोर येत आहे. या हल्ल्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.’’