पुणे : हिंजवडी, माण, मारुंजी यासह इतर भागांतील नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह रोखणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नाल्याभोवती उभारण्यात आलेल्या बांधकामांचे सर्वेक्षण करून ती अधिकृत आहेत की अनधिकृत याचा अहवाल तातडीने तयार केला जाईल. त्यानंतर अनधिकृत बांधकामे तातडीने पाडण्यात येतील, अशी थेट भूमिका महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बुधवारी घेतली.
हिंजवडीतील आयटी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरी समस्या निराकरणासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संयुक्त आढावा बैठक घेतली. नागरिकांना दिलासा मिळेल, अशा कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले. यावेळी डॉ. म्हसे म्हणाले की हिंजवडी, माण, मारुंजीसह इतर काही भागांत ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओढे – नाल्यांतील पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे प्रामुख्याने या समस्या पुढे येत आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरील सर्व यंत्रणांनी सामूहिक प्रयत्न करून ओढे – नाल्यांची स्वच्छता करून रस्त्यावरील राडारोडा तातडीने उचलून न्यावा.
या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, पीएमआरडीएच्या विकास व परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे, अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड, जिल्हा परिषद, महावितरण, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन, पिंपरी-चिंचवड महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंजवडीतील कंपन्यांचे प्रतिनिधी, सोसायट्यांचे पदाधिकारी, महापारेषण, वाहतूक पोलीस, हिंजवडी, माण, मारुंजी या ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- सांडपाणी वाहिन्यांची तातडीने सफाई
- प्रदूषणकारी सोसायट्या, कंपन्यांवर कारवाई
- पावसाचे पाणी वाहून जाण्याचे नियोजन
- पावसाचे पाणी उपसण्यासाठी पंप
- कचरा व्यवस्थापनात सुधारणा
- मेट्रो प्रकल्पाचा राडारोडा तातडीने उचलणार
- मेट्रो मार्गावरील रस्ते लवकरच सुस्थितीत
- पोलिसांकडून वाहतुकीचे चांगले नियोजन
- प्रलंबित कामांसाठी एकत्रित व्हॉट्सॲप ग्रुप
हिंजवडी भागात सुरू असलेल्या मेट्रोसह इतर कामांमुळे रहदारीस अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेने आपली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. यासह नागरी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करत दृश्य स्वरूपात कामातून बदल दिसेल, अशी कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करावीत.
डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए
काही गृहनिर्माण संस्था आणि कंपन्या दूषित पाणी नाल्यात सोडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. आजच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी प्रत्यक्ष पाहणी करून तक्रारींची शहानिशा केली जाणार आहे. नाल्यात दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
बाबासाहेब कुकडे, प्रभारी प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
नैसर्गिक जल प्रवाहांवर अतिक्रमण करून बांधकामे करणाऱ्यांवर कारवाईची आमची मागणी होती. त्या अनुषंगाने आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची पुनर्ऱचना आणि याचबरोबर मेट्रो आणि एमआयडीसीला सांडपाणी वाहिन्यांतील अडथळे दूर करून त्यांचा प्रवाह सुरळीत करण्याची सूचनाही करण्यात आली.
रवींद्र सिन्हा, हिंजवडी आयटी रेसिडंट्स वेलफेअर असोसिएशन (हिरवा)
विविध सरकारी यंत्रणांत समन्वय नसल्याचा मुद्दा आम्ही उपस्थित केला होता. यावर सर्व यंत्रणांचा एकत्रित व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. बैठकीत तातडीने करावयाच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत नियोजन करण्यात आले. यामुळे तातडीने समस्या सोडविण्यासाठी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.ज्ञानेंद्र हुलसुरे, हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्ट (हार्ट)