Pahalgam terror attack पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सगळा देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा पर्यटक हे महाराष्ट्रातले आहेत. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणण्यात आले. पुणे विमानतळावरुन या दोघांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना आणि उपस्थितांना नेमकं काय झालं ते सांगितलं आहे.
कौस्तुभ गणबोटे यांची दहशतवादी हल्ल्यात हत्या
जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कौस्तुभ गणबोटे यांच्या काकूंशी काही माध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, आमचा त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नव्हता. मला तो फिरायला गेला आणि त्याच्यावर हल्ला झाला, असं मला मोठ्या सुनेने सांगितलं. घरातील कोणाचाही त्यांच्याशी संपर्क झाला नाही. कौस्तुभच्या बायकोचा फोन आला होता. तो घरी आला होता, तेव्हा मी जाणार आहे फिरायला तिकडे असं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, मी आता नाहीये इकडं तेवढंच बोलला. कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी सुरक्षित आहे, आम्हाला कोणीच काही सांगत नव्हतं नेमकं काय झालं. असं कौस्तुभ गणबोटेंच्या काकूने सांगितलं होतं. तर आज शरद पवार यांच्यासमोर कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीने काय घडलं ते सांगितलं.
कौस्तुभ गणबोटेंची पत्नी काय म्हणाली?
“कौस्तुभ गणबोटेंचा मित्र कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. अजान पढता है क्या विचारलं? आम्ही हे ऐकल्यावर पटापटा टिकल्या काढून फेकल्या आणि अल्ला हो अकबर म्हणायला लागलो. जोरजोरात अल्लाचं नाव घेतलं तेव्हा तो निघून गेला पण दोघांना (कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे ) यांना मारुन टाकलं. आणखी एकजण मागे बसला होता त्यालाही मारलं.” असं कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवारांना सांगितलं.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. कौस्तुभ व संतोष हे आपल्या कुटुंबीयांबरोबर काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. बैसरन भागात फिरत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधी त्यांना धर्म विचारला, त्यानंतर गोळ्या झाडल्या. कौस्तुभ व संतोष या गोळीबारात जखमी झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य व स्थानिकांनी रुग्णालयात नेलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं तीच हकिकत कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितली आहे.