गोवर हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळणारा एक सौम्य आजार आहे. प्रतिबंधात्मक लशीच्या मदतीने त्याचा संसर्ग रोखता येतो, तसेच योग्य वेळी निदान आणि औषधोपचार केल्याने त्याचे गांभीर्य कमी राखण्यासही मदत होते. त्यामुळे पालकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>पुणे: नवले पूल अपघात प्रकरणात दोन ट्रकचालक अटकेत
मुंबईतील गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील डॉक्टरांकडून पालकांना खबरदारीचा इशारा देण्यात येत आहे. ज्या मुलांचे गोवर लसीकरण पूर्ण झालेले नाही, त्यांनी प्राधान्याने लसीकरण करावे, असेही बालरोगतज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.ताप येणे, शरीरावर लाल पुरळ, डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत. विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी आजाराची लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीला ताप, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे अशी लक्षणे असतात. दोन चार दिवसांनंतर अंगावर पुरळ येतो, तो कानामागे, छाती, चेहरा, पोटावर पसरतो.
हेही वाचा >>>पुणे: दोन हजार दुचाकींचा विमा मोटारीच्या नावे उतरवून फसवणूक; दोन दलाल अटकेत
बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारेख म्हणाले, की गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर होण्याची शक्यता असते. गोवर झालेल्या रुग्णाला सलग दोन दिवस ‘अ’ जीवनसत्त्वाची मात्रा दिल्यास आजार नियंत्रणात येतो. गोवरचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण हा परिणामकारक उपाय आहे. सर्व शासकीय रुग्णालयांत ही लस उपलब्ध आहे. लशीची पहिली मात्रा नऊ महिने पूर्ण ते १२ महिने आणि दुसरी मात्रा १५ महिने या वयोगटात देण्यात येतो.
हेही वाचा >>>शिक्षक बदली प्रक्रियेत चुकीची माहिती दिल्यास शिस्तभंगाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा ईशारा
डॉ. सम्राट शहा म्हणाले, की शरीरातील पाण्याची पातळी कमी न होणे (डिहायड्रेशन) महत्त्वाचे आहे. त्यासाठी भरपूर पाणी पिणे, द्रव पदार्थांचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे. सूप, फळांचे ताजे रस, सरबते, नारळाचे पाणी आहारात असावे. पुरेशा प्रमाणात ‘अ’ जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश असावा. गोवर संसर्गामुळे त्वचेवर येणारी खाज कमी होण्यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्याने फायदा होतो.