पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाच्या कामाला उच्चदाब वीज खांबांचा अडथळा निर्माण झाला आहे. जलवाहिनी टाकण्याच्या कामाला अडथळा ठरणारे ३०० उच्चदाब वीज खांब हटविण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन काेटी ३१ लाख रुपये खर्च येणार आहे. हे खांब हटविल्यानंतर जलवाहिनीच्या कामाला गती येईल, असा दावा महापालिकेने केला आहे.
शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आंद्रातून १०० आणि भामा आसखेड धरणातून १६७ असे २६७ दशलक्ष (एमएलडी) पाणी आणण्याचे नियोजन केले. धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी महापालिकेने २०२० मध्ये निविदा प्रक्रिया राबवून जलवाहिनी टाकण्याचे काम ऑफशोअर इंडिया लि. या ठेकेदाराला दिले. या कामाची चार वर्षांची मुदत संपली, तरी हे काम अपूर्णच आहे. मुदतीमध्ये जलवाहिनीचे केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले. नवलाख उंब्रेपासून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. जलवाहिनीचे काम १६२ काेटी रुपयांचे आहे. कामाची मुदत १५ डिसेंबर २०२४ अशी चार वर्षांची हाेती, मात्र या मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ठेकेदाराला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.
खेड येथील वाकीतर्फे वाडा येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून इंदोरीपर्यंत जलवाहिनीच्या कामाला ३०० उच्चदाब खांब अडथळा ठरत आहेत. हे खांब हटविण्यासाठी महापालिकेने तीन कोटी चार लाख ६३ हजार ४४८ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदा प्रक्रियेत सात ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यातील २३.९९ टक्के कमी दाराची निविदा स्वीकारली. या ठेकेदाराकडून दोन काेटी ३१ लाख ५५ हजार २६७ रुपयांमध्ये काम करून घेण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली.
आंद्रा धरणाच्या जलवाहिनीचे काम प्रलंबित
आंद्रा धरणातील पाणी नवलाख उंब्रे येथून एकाच जलवाहिनीतून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणार आहे. तिथपर्यंत साडेसात किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. परंतु, या कामाला अद्याप सुरुवात झाली नाही. सध्या इंद्रायणी नदीतून निघोजे बंधाऱ्यातून पाणी उचलले जाते.
दररोज पाणीपुरवठ्यासाठी प्रतीक्षा
मागील सहा वर्षांपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर पाणी आणल्यास दररोज पाणीपुरवठा करता येईल. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी २०२६ उजाडणार आहे. तोपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
जलवाहिनीला अडथळा ठरणारे ३०० उच्चदाब खांब हटविण्यात येणार आहेत. जिथे अडथळा येईल, तेथील खांब तत्काळ हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे जलवाहिनीच्या कामाला गती येईल. – अनिल भालसाखळे, सह शहर अभियंता, विद्युत विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका