दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेची कारवाई विमाननगर परिसरातील संजय पार्क झोपडपट्टी परिसरात झालेल्या अतिक्रमणावर दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने कारवाई केली असून येथील रस्ते आणि पदपथ या कारवाईनंतर मोकळे झाले आहेत. येथील अतिक्रमणाच्या विरोधात पंतप्रधान कार्यालयाकडेही तक्रार करण्यात आली होती. पंतप्रधान कार्यालयाने वेळोवेळी निर्देश देऊनही दोन वर्षे काहीच कारवाई करण्यात आली नव्हती. विमाननगर परिसरातील काही भाग पूर्वीपासूनच झोपडपट्टी भाग म्हणून ओळखला जातो. पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धाच्या दरम्यान विमाननगर भागात अनेक नवीन रस्ते विकसित करून तेथील अतिक्रमणे काढण्यात आली होती. त्या वेळी या परिसरातील नागरिक संजय पार्क परिसरात येऊन दाखल झाले. तेव्हापासून तेथे रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी होत्या. विमानतळ परिसरातील विमाननगर येथील संजय पार्क परिसरातून जाताना रस्ता आणि पदपथांवर प्रचंड अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्त्यां कनिज सुखरानी यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. परदेशातून कोणी पाहुणे, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी शहरात दाखल झाल्यानंतर विमाननगर येथील संजय पार्क झोपडपट्टी परिसरात डोळ्यात भरणारे झालेले अतिक्रमण पाहून शहराबद्दल नकारात्मक दृष्टिकोन होण्याचा धोका आहे, अशा अतिक्रमणांमुळे केंद्राच्या स्वच्छ भारत अभियान व स्मार्ट सिटी अभियानाला हरताळ फासला गेला असून तेथे तातडीने कारवाई करून रस्ता व पदपथ मोकळे करावेत अशा स्वरूपाची तक्रार देण्यात आली. परंतु महापालिकेने नेहमीप्रमाणे तक्रारीकडे दुर्लक्ष केले. अतिक्रमणांबाबत दिलेल्या तक्रारीची सुनावणी लोकशाही दिनात घेण्यात यावी, तसेच येथील अतिक्रमण हटवून पदपथांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी ३ डिसेंबर २०१४ रोजी करण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांसमोर या प्रकरणी सहा वेळा सुनावण्या झाल्या. परंतु प्रत्येक सुनावणीदरम्यान अत्यंत बेजबाबदारपणे हा विषय हाताळला गेला आणि सहा सुनावण्या झाल्यानंतर महापालिकेच्या अंदाजपत्रकात संबंधित ठिकाणी भिंत बांधण्यासाठी आर्थिक तरतूद केली नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची महापालिका आयुक्तांसमोर चार वेळा आणि पालिकेच्या विभागीय आयुक्तांसमोर सात वेळा सुनावणी झाली. अखेर दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर चालू वर्षांत झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेचे अध्यक्ष, क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी यांनी परस्पर संमतीने तोडगा काढल्यानंतर अतिक्रमणे हटविली असून तेथे पत्र्याची भिंत बांधली आहे.