पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील जलकोंडीला नैसर्गिक जलप्रवाहांवरील अतिक्रमण कारणीभूत ठरल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. आयटी पार्कमध्ये १५ नैसर्गिक प्रवाहांवर अतिक्रमण करून ते अडविल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रवाह अडविणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गुरुवारी दिले.

नैसर्गिक ओढे-नाल्यांचा प्रवाह खंडित केल्यामुळे हिंजवडी टप्पा एक, दोन आणि तीन, तसेच मेट्रो मार्गासह परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना अडचणी येत असल्याने खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. म्हसे यांनी विविध प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले.

पीएमआरडीए, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि इतर हद्दीत नियमांचा भंग करून बांधकामे करण्यात आली आहेत. ओढे, नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह जवळपास १५ ठिकाणी काही कंपन्या, विकासक आणि नागरिकांनी परस्पर रोखून दुसरीकडे वळविला असून, ही बांधकामे तातडीने थांबवून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

हिंजवडीमध्ये पाणी साचण्याच्या ठिकाणी नागरी सुविधांची कामे गेल्या आठवड्यापासून विविध प्रशासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येत आहेत. यात आयटी पार्कमधील रस्ते दुरुस्तीसह मेट्रो मार्गिकेलगत असलेला राडारोडा हटवणे, गटारे व नालेसफाई, खड्डे बुजवणे, अनधिकृत स्टॉल हटवणे आदी कामे झाल्याने बहुतांश प्रमाणात समस्या सुटल्या आहेत. मात्र, पावसाचा जोर कायम असल्यामुळे काही कामे करण्यास वेळ लागत आहे. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

सर्वेक्षणात नेमके काय?

हिंजवडी आयटी पार्कमध्ये डोंगरावरून खाली येऊन नदीत मिसळणाऱ्या ओढे आणि नाल्यांचे ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात १५ ठिकाणी नैसर्गिक प्रवाह रोखण्यात आल्याचे समोर आले. नैसर्गिक प्रवाह रोखून त्या ठिकाणी अनेकांनी मोठी बांधकामे केली आहेत. या बांधकामांवर कारवाईचे पाऊल लवकरच ‘पीएमआरडीए’कडून हाती घेण्यात येणार आहे.

आयटी पार्कमधील नागरी समस्यांबाबत उपाययोजनांचे निर्देश विविध शासकीय यंत्रणांना दिले होते. आतापर्यंत झालेल्या उपाययोजनांचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. आयटी पार्कमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे निर्देशही विविध यंत्रणांना दिले आहेत. आयटी पार्कमधील समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील. – डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंजवडी परिसरातील नैसर्गिक जलप्रवाह अडविण्यात आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. शास्त्रीय पद्धतीने नैसर्गिक प्रवाहांचा अभ्यास करून त्यांना नेमके कोठे अडविले गेले, याचा अभ्यास करायला हवा. हे ओढे मूळ स्थितीत आणण्याची आवश्यकता असून, त्यासाठी त्यावर अतिक्रमण करून केलेली बांधकामे पाडावी लागतील. हे वेळीच न केल्यास भविष्यात आयटी पार्कमध्ये आंबील ओढ्यासारखी दुर्घटना घडू शकते. – रवींद्र सिन्हा, हिंजवडी रेसिडंट्स वेलफेअर असोसिएशन.