पुणे जिल्ह्यातील पाटस येथील टोल नाक्याजवळ एसटी बस थांबून आम्ही पोलीस आहोत, ज्यांच्याकडे पास आहेत. अशा व्यक्तींची तपासणी करायची आहे. असे सांगून चौघांकडून तब्बल १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रूपयांची रक्कम आणि सोने लुटण्याची घटना घडली होती. या घटनेला काही तास होत नाही तोच गुन्हे शाखेने तीन आरोपांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

रामदास भाऊसाहेब भोसले, (वय ३० वर्षे, रा. वरुडे, ता. शिरूर, जि. पुणे), तुषार बबन तांबें (वय २२ वर्षे, रा. वरूडे, ता. शिरूर, जि. पुणे) आणि भरत शहाजी बांगर (वय ३६ वर्षे, रा. गणेगाव खालसा, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास लातूर ते मुंबई या एस.टी. बसमधून कुरिअर कंपनीतील चौघे जण मुंबईच्या दिशेने १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन जात होते. त्याच दरम्यान एसटी यवत टोल नाक्याजवळ आल्यावर एक चार चाकी गाडी बसला आडवी करण्यात आली. त्या वाहनातील तिघेजण बसमध्ये आले आणि आम्ही पोलीस आहोत, पासधारक कोण आहेत. त्यांच्याकडे आम्हाला चौकशी करायची आहे. अशी विचारणा केली. त्यावर बसमधील चौघांना खाली घेऊन गेल्यावर, ९२ लाख ८४ हजार ५४० रोख रक्कम आणि सोन्याची दागिने असे एकूण १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रुपये घेऊन तिघेजण घेऊन पसार झाले.

त्यानंतर फिर्यादीने यांनी घटनेची माहिती देताच, रस्त्यावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही तपास सुरू असताना. आरोपी रामदास भोसले हा खराडी बायपास येथे साथीदारासह पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे तात्काळ खराडी बायपास येथे रामदास भाऊसाहेब भोसले, तुषार बबन तांबे, आणि भरत शहाजी बांगर या तिघांना खराडी बायपास येथून ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून ८० टक्के रक्कम मिळाली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.