‘आजकाल सर्वत्र धरणे, रस्ते, बिल्डिंग, विमानतळ बांधणे म्हणजेच विकास असे मानले जात आहे आणि याला विरोध म्हणजे विकासाला विरोध, जणूकाही देशद्रोहच आहे, असे मानले जात आहे. विकास व्हावा मात्र तो भूमिपुत्रांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून नसावा,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.
बडोदे मित्र मंडळाच्या वतीने गंगूताई पटवर्धन स्मृती व्याख्यानाअंतर्गत ‘पर्यावरण, विस्थापन आणि विकास यांत समतोल साधणे शक्य आहे का?’ या विषयावर पाटकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘स्थानिकांना विस्थापित करून त्यांना नुकसान भरपाई न देता, निर्माण झालेल्या कामातून मिळणाऱ्या लाभातही वाटा दिला जात नाही,’ ‘विकासाचे निकष हे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वात नमूद केलेले आहेत. मात्र ते बंधनकारक नाही हे दुर्दैव आहे,’ असेही त्या म्हणाल्या.