पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी आणि ठाेकरवाडी धरणातून पाणी आणण्याच्या हालचाली सुरू असतानाच महापालिकेने जलसंपदा विभागाला नवीन प्रस्ताव दिला आहे. शेतीसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचे प्रमाण वाढवून, त्या बदल्यात पाणीकोटा वाढवून देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेकडून जलसंपदा विभागाला देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडत आहे. सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. सद्य:स्थितीत महापालिका मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणी उचलते. भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शहरासाठी राखीव आहे. हे पाणी २०२६ मध्ये मिळणार आहे. उपलब्ध होणारे पाणी भविष्यात पुरेसे नाही. त्यासाठी पाण्याचा पर्यायी स्रोत निर्माण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पुणे जिल्ह्यात २० पेक्षा अधिक लहान-मोठी धरणे आहेत.

मुळशी आणि ठाेकरवाडी धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाणी आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. शहरासाठी आणखी काेणत्या धरणातून पाणी आणता येईल, याबाबत चर्चा झाली. आगामी काळात सांडपाण्यावर जास्तीत-जास्त प्रक्रिया केली जाईल. प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकून देण्यात येईल. त्यापोटी जलसंपदा विभागाने पिण्यासाठी वाढीव पाणी देण्याची मागणी महापालिका अधिकाऱ्यांनी केली.

पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८०, तर एमआयडीसीकडून २०, असे ६२० एमएलडी पाणी महापालिका दररोज उचलते. त्यापैकी २० सांडपाणी केंद्रांमार्फत ३०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. आता सांडपाण्यावरील प्रक्रियेत वाढ करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. ते पाणी शेतीसाठी दिले जाणार आहे, याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने जलसंपदा विभागाकडे दिला आहे.

शंभर कोटींची पाणीपट्टी

पवना, आंद्रा धरणातून पाणी घेतले जाते. भविष्यात भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे. या पाण्यापोटी महापालिका जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी भरते. त्यात दहा टक्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला जलसंपदा विभागाला वर्षाला शंभर कोटी रुपयांची पाणीपट्टी द्यावी लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाण्याचे पर्याय वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सांडपाण्यावरील प्रक्रिया क्षमता वाढवून ते पाणी शेतीसाठी दिले जाईल. त्यापोटी पिण्यासाठी वाढीव पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली आहे. – प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका