पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागा देण्यासाठी गेल्या सात दिवसांत ५६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यानुसार १ हजार ३१० शेतकऱ्यांनी १ हजार ५८० एकर जागा देण्याबाबतची संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाला दिली असून, पुरंदर तालुक्यातील एखतपूर आणि खानवडी या गावातून सर्वाधिक शेतकऱ्यांनी संमतिपत्रे प्रशासनाला दिली आहेत.

पुरंदर विमानतळासाठीची भूसंपादन प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून संमतिपत्रे स्वीकारण्यात येत आहेत. संमतिपत्र सादर करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली असून ही मुदत १८ सप्टेंबर रोजी संपणार आहे. या मुदतीत संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना विकसित भूखंडासह चौपट मोबदलाही देण्यात येणार आहे. भूसंपादनाला गती देण्यासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधून साडेसात हजार एकरऐवजी आता तीन हजार एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

गेल्या आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाने पुरंदरमधील एखतपूर, कुंभारवळण, खानवडी, मुंजवडी, उदाचीवाडी, पारगाव आणि वनपुरी या सात गावांमधून भूसंपादनापूर्वी संमती घेण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील सात गावांमध्ये आठवडात १ हजार ५८० एकर जमिनीची म्हणजेच सुमारे ५६ टक्के जमीन देण्याची संमती शेतकऱ्यांनी दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडन देण्यात आली. पारगाव, एखतपूर आणि खानवडी या गावांतील शेतकऱ्यांनी सर्वाधिक संमतिपत्रे दिल्याचेही सांगण्यात आले. शेतकऱ्यांकडून संमतिपत्रे देण्यात येत असल्याने विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, संमतिपत्रे पंधरा दिवसांचा कालावधी बाकी आहे. मुदतीमधील १८ सप्टेंबरनंतर काही शेतकऱ्यांचे मत परिवर्तन झाल्यास त्यांनी जमीन देण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांची जमीन घेता येणार नाही. शेतकऱ्यांना १८ सप्टेंबरपर्यंतच जमीन देण्यासंदर्भातील संमतिपत्रे देता येणार आहेत. संमतिपत्रे देण्यास मुदतवाढ मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

पुरंदर विमानतळासाठी प्रारंभी जमीन देण्यास विरोध होत असल्याने साडेसातऐवजी तीन हजार एकर जमीन संपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सध्या निम्म्याहून अधिक जमिनीची संमती मिळाली आहे. उर्वरीत ४४ टक्के शेतकऱ्यांची संमती पुढील दोन आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. जमिनींचे संपादन करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने साडेसात हजार एकर जागेवर विमानतळासाठी म्हणून शेरा मारला होता. मात्र, आवश्यक जमीन संपादनानंतर तीन हजार एकर जमिनीबाहेरील जागेवरील विमानतळासाठीचा शेरा उठविण्यात येणार आहे. त्यानुसार सुमारे चार हजार एकर जागेवरील असलेले शेरे काढण्यात येतील, अशी माहितीही जिल्हा प्रशानसाकडून देण्यात आली.