पुणे : राज्यातील शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे तीन वर्षांच्या खंडानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीसाठी राज्यभरातील २ लाख ३६,५९१ उमेदवारांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती पवित्र प्रणालीमार्फत केली जाते. त्यासाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येते. ही चाचणी संगणकीय पद्धतीने घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेने केले आहे. या चाचणीचे अर्ज भरण्यासाठी परीक्षा परिषदेने आधी २६ एप्रिल ते १० मेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर ती १४ मेपर्यंत वाढवण्यात आली. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या मुदतीमध्ये २ लाख ३६ हजार ५९१ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ही परीक्षा उमेदवारांना मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून देता येणार आहे. दोनशे गुणांच्या या परीक्षेत १२० गुण अभियोग्यता, तर ८० गुण बुद्धिमापनासाठी असतील. अभियोग्यता विषयात गणितीय क्षमता, भाषिक क्षमता अशा घटकांचा, बुद्धिमापन विषयात समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क-अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश असेल. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. या परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांतील भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साधारपणे तीन वर्षांनंतर राज्यात अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी होत आहे. यापूर्वी २०२२मध्ये ही चाचणी घेण्यात आली होती. त्यासाठी सुमारे २ लाख ४० हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर त्यापूर्वी २०१७मध्ये झालेल्या चाचणीसाठी सुमारे १ लाख ७२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती.