पुणे : ‘आगामी महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढवायची, की स्वबळावर याचा निर्णय पक्षाचे केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेते घेतील. मात्र, निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना प्रभागरचना, मतदारनोंदणीमध्ये लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे,’ अशी माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
भाजपच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी बाणेर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष धीरज घाटे आणि प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे या वेळी उपस्थित होते.
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासह राज्यातील अनेक मोठ्या शहरांतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत फडणवीस यांच्या आदेशानुसार कार्यकर्ते काम करतील. महायुती म्हणून किंवा स्वबळावर निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णयही फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्यातील अन्य मंत्री घेतील,’असे चव्हाण यांनी सांगितले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या ११ वर्षांत अनेक कामे केली आहेत. देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आली आहे. रस्ते, रेल्वेचे जाळे व्यापक झाले असून, पायाभूत सुविधांचाही गतीने विकास झाला आहे. ही सर्व कामे राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसने संविधानाचा कसा अपमान केला, याची माहितीही लोकांना दिली जाणार आहे,’ असे चव्हाण म्हणाले.