पुणे : ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमी कंडक्टर, क्वांटम कम्प्युटिंगमुळे येत्या काळात मोठे बदल घडणार आहेत. तंत्रज्ञान घोड्यासारखे असते. त्यावर स्वार होणे आवश्यक असते. तंत्रज्ञानामुळे गती मिळणे, अचूक निर्णय घेणे, कार्यक्षमतेमध्ये वाढ होणे शक्य आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. ‘‘एआय’द्वारे छायाचित्रे, आवाज तयार करून डिजिटल घोटाळे, फसवणूक असे प्रकारही घडतात. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा जबाबदार आणि सकारात्मक वापर गरजेचा आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

‘सिम्बायोसिस’तर्फे स्थापन करण्यात आलेल्या ‘सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट’चे (साई) उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. लवलीन गौर या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात ‘बहुभाषिक एआय साहाय्य प्रणाली’चेही उद्घाटन करण्यात आले. या प्रणालीमध्ये पहिल्या टप्प्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, अरेबिक आणि फ्रेंच या भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

फडणवीस म्हणाले, ‘एआय’मुळे नोकऱ्यांचे काय होणार, किती नोकऱ्या जाणार असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, आताच्या पिढीचा जन्म प्रगल्भ डॉट कॉम युगात झाला आहे. १९९० मध्ये डॉट कॉम सुरू झाल्यावरही असे प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, भारताने त्या प्रश्नांची उत्तरे देत या क्षेत्राचे नेतृत्व केले. आता एआयची मोठी लाट आली आहे. अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोकशाहीकरण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अत्यंत योग्य वेळी ‘सिम्बायोसिस’ने स्वतंत्र संस्थेची स्थापना केली आहे. एआयमुळे आरोग्य क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. डॉक्टर पोहोचू शकणार नाही अशा दुर्गम भागात एआय क्रांतिकारक ठरणार आहे. एआयच्या मदतीने संपूर्ण कृषी साखळीवर देखरेख करणे शक्य असल्याने शेतकऱ्यांचे जीवन सुखकारक होणार आहे.’

‘कृत्रिम बुद्धिमत्तेला वाहिलेली, पदवीपूर्व स्तरावर शिक्षण देणारी ‘साई’ देशातील पहिली शिक्षण संस्था आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका महत्त्वाची असणार आहे. तर, पाचवी क्रांती आध्यात्मिक तंत्रज्ञानाची असेल,’ असे डॉ. मुजुमदार म्हणाले. तर ‘साई’ ही बिगर अभियांत्रिकी संस्था आहे. या संस्थेद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत मार्गदर्शन करणारे बीबीए आणि बीएस्सी अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत, असे डॉ. येरवडेकर यांनी सांगितले.

‘माझाच व्हिडिओ पाहिला अन्…’

फडणवीस यांनी ‘एआय’च्या गैरवापराबाबतचा स्वत:चाही अनुभव सांगितला. ‘एआय वापरून तयार केलेला माझाच एक व्हिडिओ समाज माध्यमांत पाहिला. मात्र, त्यातील भाषण काही वेगळेच होते. वैद्यकीय जाहिरातीचा मजकूर त्यात होता.’

‘कोंडी सोडवण्यासाठी ‘गुगल’शी करार’

‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानासाठी राज्य शासनाने मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने मुंबई, पुणे, नागपूर येथे तीन संस्थांची स्थापना केली आहे. या संस्था कायदा आणि सुव्यवस्था, कृषी, तंत्रज्ञान, प्रशासन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करतील. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या उपाययोजना सुचवण्यासाठी ‘गुगल’सह करार केला आहे,’ असेही फडणवीस यांनी सांगितले.