पुणे : ‘पावसामुळे आयटी पार्क असलेल्या हिंजवडी येथे रस्ते जलमय होऊन उडालेली दैना राज्यातील भारतीय जनता पक्षासाठी लाजिरवाणी बाब आहे,’ अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
‘आयटी पार्क क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणे, त्यांना मुलभूत नागरी सुविधा पुरविणे, यासाठी प्राधान्य देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक उद्योग पुण्यातून बाहेर जात आहेत. परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी बाहेरून आणावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आश्वासने देण्यापलीकडे कोणतेही काम करू शकलेले नाहीत,’ असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
‘माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्याचे धोरण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आखले. त्यातूनच हैदराबाद, पुणे, बंगळुरू येथे आयटी पार्क विकसित झाले. हिंजवडीतील प्रकल्पाला उत्तेजन देऊन अधिकाधिक उद्योजक पुण्याकडे यावेत याकरीता ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी अथक प्रयत्न केले. महापालिकेत काँग्रेसचे बहुमत असताना आयटी क्षेत्राला वाव देण्यासाठी अनेक सवलती देऊ केल्या होत्या,’ असेही त्यांनी सांगितले.