पुणे : कात्रजमधील सुखसागरनगर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींंना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. मुसम्मद सोनी अब्दुल समद खातून (वय २२), मोनीरा बेगम (वय १९, दोघी मूळ रा. गुजिया, जि. बोगारा, बांगलादेश ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलीस कर्मचारी अमोल घावटे, प्रफुल्ल मोरे यांना याबाबतची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने दोघींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र सापडले. दोघी घुसखोरी करुन भारतात आल्याची माहिती मिळाली आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस कर्मचारी राजेंद्र नलावडे, कानिफनाथ कारखेले, अमोल घावटे, गणेश थोरात, प्रफुल्ल मोरे, भरत गुंडवाड, गणेश माने, सर्जेराव सरगर, शिवाजी सातपुते, शीतल जमदाडे, नेहा तापकीर यांनी ही कारवाई केली.
शहरातील वेगवेगळ्या भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या आठ पथकांची स्थापना केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रोजगाराच्या शोधात घुसखोरी करुन बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आले. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून यापूर्वी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बांगलादेशी तरुणी वेश्याव्यवसाय करत असल्याचे आढळून आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेशींचा शोध, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आठ विशेष पथकांची स्थापना केली आहे.
शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शाेध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. बांगलादेशींना भाड्याने घरे देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
आठ बांगलादेशींवर कारवाई
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आल्यानंतर आतापर्यंत आठ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बांगलदोशी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात येणार आहे.